कोकणातील ग्रामपंचायतीचे ऐतिहासिक पाऊल
कणकवली : विधवा प्रथेला ठाम नकार देत कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायतीने विधवा कुटुंबांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
पतीच्या निधनानंतर स्त्रीचे सौंदर्य हिरावून घेणाऱ्या आणि तिला आयुष्यभर सामाजिक बंधनांत अडकवणाऱ्या विधवा प्रथेला ठाम नकार देत कलमठ (ता. कणकवली) ग्रामपंचायतीने माणुसकीला होकार देणारा महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. ज्या घरामध्ये विधवा प्रथा पाळली जाणार नाही, अशा कुटुंबांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय कलमठ ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी घेतला आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या निर्णयाची घोषणा करण्यात आली. ‘महिला स्नेही गाव’ या संकल्पनेवर आधारित काम करत असताना, असा ठराव घेऊन कलमठ गावाच्या वतीने सावित्रीबाईंना खरे अभिवादन केल्याची भावना सरपंच संदीप मेस्त्री यांनी व्यक्त केली. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, पंचायतराज समृद्धी अभियान तसेच शासनाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या कलमठ ग्रामपंचायतीने यावेळी समाजातील अन्यायकारक प्रथांवर थेट घाव घालत विधवा प्रथा बंदीसाठी पुढाकार घेतला आहे. यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीची मोहीम सुरू केली होती.
पतीच्या निधनानंतर स्त्रीचे मंगळसूत्र काढून घेणे, बांगड्या फोडणे, कपाळावरील कुंकू पुसणे असे अमानवी कुप्रकार आजही काही गावांमध्ये पाळले जातात. स्त्रीचे सौंदर्य आणि आत्मसन्मान हिरावून घेणे हा या प्रथेचा मूळ उद्देश असल्याचे स्पष्ट होते. हेरवाड ग्रामपंचायतीच्या ठरावाची राज्य शासनाने दखल घेत सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंद करण्याचे ठराव घ्यावेत, असा निर्णय घेतला होता.
त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंदीचे ठराव मंजूर केले. काही ठिकाणी त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले, अनेक महिलांनी ही प्रथा नाकारली. मात्र, अद्यापही काही गावांमध्ये ही अमानवी प्रथा पाळली जात असल्याचे वास्तव आहे. त्याच पार्श्वभूमीवर विधवा प्रथेवर कठोर प्रहार करण्यासाठी कलमठ ग्रामपंचायतीने एक पाऊल पुढे टाकले आहे.
सरपंच संदीप मेस्त्री यांनी अध्यक्षपदावरून हा ठराव मांडला असून, सभेत तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. नववर्षाच्या पूर्वसंध्येला झालेल्या ग्रामपंचायत सभेत सरपंच मेस्त्री यांनी विधवा प्रथा पूर्णपणे बंद करणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले. ज्या घरामध्ये विधवा प्रथा पाळली जाणार नाही, अशा कुटुंबांची घरपट्टी व पाणीपट्टी थेट माफ करण्याचा निर्णय घेतल्याने या ठरावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करत, यापुढे कलमठ गावात ही प्रथा पूर्णतः बंद करण्यासाठी ग्रामपंचायत कसोशीने प्रयत्न करेल. कोणत्याही सामाजिक प्रथेपेक्षा माणुसकी श्रेष्ठ असून, त्याच भावनेतून हा निर्णय घेतला.






