Wednesday, January 7, 2026

भुयारी मेट्रो मार्गिकेमध्ये नेटवर्कची गैरसोय कायम !

भुयारी मेट्रो मार्गिकेमध्ये नेटवर्कची गैरसोय कायम !

तोडगा काढण्यात एमएमआरसीएल ढिम्म

मुंबई : आरे ते कफ परेड या मेट्रो-३ भुयारी मेट्रोच्या संपूर्ण मार्गिकेमध्ये मोबाईल नेटवर्कची समस्या कायम आहे. मोबाईल नेटवर्क सुरू करण्याबाबत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसीएल) आणि दूरसंचार सेवा पुरवठादार कंपन्यांमध्ये अद्याप तोडगा निघालेला नाही. मेट्रो स्थानकांतील पायाभूत सुविधांशी जोडणी करण्यासाठी ‘एसीईएस इंडिया’ या त्रयस्थ कंपनीकडून दूरसंचार कंपन्यांना अवाजवी दर आकारले जात असल्याचे बोलले जात आहे. या तिढ्याचा तोडगा काढण्यात एमएमआरसीएल ढिम्म असल्याने नियमित प्रवाशांची नेटवर्कअभावी गैरसोय होत आहे.

आरे ते कफ परेडदरम्यान मेट्रो-३ मार्गिकेची भुयारी मेट्रो सेवा सुरू आहे. यातील वरळी ते कफ परेडपर्यंतचा शेवटचा टप्पा सुरू होऊन तीन महिने उलटून गेले असतानाही मोबाईल नेटवर्कचा प्रश्न कायम आहे. मेट्रो मार्गिकेच्या केवळ काही मर्यादित भागांमध्येच वोडाफोन-आयडिया आणि बीएसएनएलचे नेटवर्क उपलब्ध आहे. प्रवासादरम्यान मोबाईलवरून बाहेरील संपर्क साधणे शक्य होत नाही. दररोज तिकिटासाठी ५० ते ७० रुपये मोजावे लागतात, तरीही एमएमआरसीएल प्रशासन प्रवाशांसाठी मोबाईल नेटवर्कची सुविधा उपलब्ध करण्यात इतके ढिम्म का? असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. ‘अॅक्वा लाइन’साठी एमएमआरसीएलने एसीईएस इंडिया लिमिटेड या कंपनीसोबत भागीदारी केली आहे. मात्र, टेलिकॉम कंपन्यांचा आरोप आहे, की एसीईएसकडून नेटवर्क उभारणीसाठी अवाजवी दर आकारले जात आहेत. अनेक बैठका होऊनही तोडगा न निघाल्यामुळे अद्याप काही मेट्रो प्रवाशांना नेटवर्क सुविधा मिळू शकलेली नाही. एका प्रमुख टेलिकॉम ऑपरेटरच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसीईएसने ११८ कोटी रुपयांचा भांडवली खर्च असल्याचा दावा केला आहे. मात्र, टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या अंतर्गत अंदाजानुसार हा खर्च फक्त सुमारे ३० कोटी रुपयांपर्यंत असायला हवा.

सूत्रांनी सांगितले की, सुरुवातीला मुंबई मेट्रो आणि त्यांच्या विक्रेत्याकडून प्रति स्टेशन १३ लाख रुपये मागितले जात होते. नंतर हे शुल्क कमी करून प्रति स्टेशन ५.५ लाख रुपये करण्यात आले. दुसरीकडे, टीपीएसच्या अंतर्गत गणनेनुसार प्रति स्टेशन दरमहा प्रत्येकी ३९,००० रुपये भांडवली खर्च आणि त्यावर १० टक्के व्यवस्थापन शुल्क देणे अपेक्षित आहे. याच आर्थिक वादामुळे भुयारी मेट्रो मधील नेटवर्क प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही आणि त्याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा