अहिल्यानगर : इगतपूरीजवळील गिरणारे येथील काही तरुण पालखी घेऊन शिर्डीला गेले होते. त्यापैकी काही तरुण शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी रिक्षाने निघाले होते. मात्र, दर्शनाआधीच त्यांच्यावर काळाने झडप घातली. राहुरीहून भरधाव वेगात येणाऱ्या मिनी बसने रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर मिनी बस रस्त्याच्या कडेला उलटली.
राहुरी–शनीशिंगणापूर मार्गावर उंबेरे गावाजवळ भरधाव मिनी बस आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात इगतपुरी तालुक्यातील गिरणारे गावातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, इगतपूरीजवळील गिरणारे येथील काही तरुण पालखी घेऊन शिर्डीला गेले होते. त्यापैकी काही तरुण शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी रिक्षाने निघाले होते. मात्र, दर्शनाआधीच त्यांच्यावर काळाने झडप घातली. राहुरीहून भरधाव वेगात येणाऱ्या मिनी बसने रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर मिनी बस रस्त्याच्या कडेला उलटली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र, रिक्षातील तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या अपघातात दीपक जगन डावखर (२२), आकाश मनोहर डावखर (२२) आणि दीपक विजय जाधव (२२) या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तिघेही नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी तालुक्यातील गिरणारे गावचे रहिवासी होते.
दरम्यान, या अपघातात रूपेश गणेश भगत (१९) आणि रोशन गंगाधर डावखरे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला?, मिनी बसचा वेग किती होता? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.






