अकोला : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काहीही घडू शकते' याची प्रचिती अकोट आणि अंबरनाथ नगरपरिषदेच्या निमित्ताने आली आहे. विचारधारेच्या पलीकडे जाऊन सत्तेसाठी परस्परविरोधी पक्ष एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेषतः अकोट नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाने थेट 'एमआयएम'ला सोबत घेतल्याने आणि अंबरनाथमध्ये काँग्रेसशी हातमिळवणी केल्याने भाजपच्या 'काँग्रेसमुक्त भारत' आणि विचारधारेच्या घोषणेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अकोट नगरपरिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने एक नवा प्रयोग केला आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 'अकोट विकास मंच' स्थापन करण्यात आला असून, यामध्ये भाजप आणि एमआयएम (MIM) एकत्र आले आहेत. या मंचाची विशेष बाब म्हणजे यामध्ये शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि बच्चू कडूंची प्रहार जनशक्ती हे सर्वच एकमेकांचे विरोधक सहभागी झाले आहेत. दुसरीकडे, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेतही धक्कादायक समीकरण समोर आले आहे. येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने थेट काँग्रेसशी युती केली आहे. राज्याच्या राजकारणात भाजप आणि शिंदे गट एकत्र असताना, स्थानिक पातळीवर मात्र सत्तेसाठी भाजपने काँग्रेसचा हात धरल्याने एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. याच दरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
मुंबई : तीन शेजारी देशांमधून भारतात घुसणाऱ्या असंख्य बेकायदा स्थलांतरितांमुळे भारताची सुरक्षा आणि विकास हे दोन्ही एकदमच घोर संकटात सापडले आहेत, अशी ...
देवेंद्र फडणवीस यांचा स्थानिक नेत्यांना सज्जड इशारा
या सगळ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अकोटमध्ये भाजपची एमआयएमसोबत आणि अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत झालेली हातमिळवणी ही पक्षाच्या विचारधारेला धरून नसून, अशा प्रकारच्या युतीला भाजपमध्ये कोणतेही स्थान नाही, अशा कडक शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक नेत्यांच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला. "काँग्रेस आणि एमआयएम या दोन पक्षांसोबत भाजपची युती होणे कधीही शक्य नाही. स्थानिक पातळीवर जर अशा हालचाली झाल्या असतील, तर त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. पक्षाची विचारधारा गहाण ठेवून केलेली कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही," असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. केवळ नाराजी व्यक्त करून न थांबता, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. "ज्या कुणीही स्थानिक नेत्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेतृत्वाला अंधारात ठेवून ही युती केली आहे, त्यांची चौकशी केली जाईल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल," असे आश्वासन त्यांनी दिले आहे. यामुळे अकोट आणि अंबरनाथमधील भाजप नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
नेमकं काय घडलं अकोट नगरपरिषदेत?
अकोट नगरपरिषदेच्या ३५ सदस्यीय सभागृहात भाजपने ११ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा मान मिळवला आणि माया धुळे या थेट नगराध्यक्षपदी निवडून आल्या. मात्र, सभागृहात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेले बहुमत (१८ पेक्षा जास्त सदस्य) भाजपकडे नव्हते. हे बहुमत जुळवण्यासाठी भाजपने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या एमआयएम (५ जागा) आणि इतर मित्रपक्षांना सोबत घेऊन 'अकोट विकास मंच'ची स्थापना केली आहे. भाजपचे नगरसेवक रवी ठाकूर यांची या आघाडीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या नव्या आघाडीमुळे एक विलक्षण तांत्रिक बदल झाला आहे. एमआयएमच्या नगरसेवकांना आता भाजपचे गटनेते रवी ठाकूर यांनी काढलेला 'व्हिप' (आदेश) पाळावा लागणार आहे. आगामी १३ जानेवारी रोजी होत असलेल्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीत ही आघाडी आपली ताकद दाखवणार आहे. या दिवशी मंचातील सर्व सदस्य एकत्रितपणे मतदान करतील, ज्यामुळे भाजपचा उपनगराध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजप आणि एमआयएम हे दोन परस्परविरोधी विचारधारेचे पक्ष सत्तेसाठी एकत्र आल्याने अकोटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
"हा तर शिवसेनेचा घात...
नगरपरिषदेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने थेट काँग्रेसचा हात धरला आहे. या 'अकल्पनीय' युतीमुळे अंबरनाथमध्ये भाजपचा नगराध्यक्ष विराजमान होणार असला तरी, राज्याच्या राजकारणात मात्र या 'अभद्र' युतीवरून वादाचे काहूर माजले आहे. अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुले यांनी नगराध्यक्षपदी बाजी मारली. मात्र, नगरपरिषदेत बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपकडे आवश्यक संख्याबळ नव्हते. सभागृहात भाजपचे १६, काँग्रेसचे १२ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ४ असे एकूण ३२ नगरसेवक एकत्र आल्याने बहुमताचा आकडा पूर्ण झाला आहे. विशेष म्हणजे, २७ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने आपल्या पारंपरिक कट्टर विरोधकाशी (काँग्रेस) घरोबा केला आहे. या युतीवर शिंदे गटाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. "एकीकडे देशपातळीवर 'काँग्रेसमुक्त भारत'च्या गर्जना करणाऱ्या भाजपने स्थानिक पातळीवर सत्तेसाठी शिवसेनेचा घात केला आहे," अशी टीका शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी केली आहे. ही युती केवळ 'तडजोड' नसून शिवसेनेच्या पाठीत खुपसलेला खंजीर असल्याची भावना शिंदे समर्थकांमध्ये आहे. श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघातच असा पेच निर्माण झाल्याने हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.






