Wednesday, January 7, 2026

मुस्तफिजूर रहमानसाठी संपूर्ण बांगलादेश वेठीला!

मुस्तफिजूर रहमानसाठी संपूर्ण बांगलादेश वेठीला!

आयपीएल प्रसारणावरील बंदीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये संताप

नवी दिल्ली : बीसीसीआयने अलीकडेच आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सला बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान याला संघातून मुक्त करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर लगेचच केकेआरने मुस्तफिझूरला आपल्या संघातून बाहेर काढले. या निर्णयामुळे बांगलादेशमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, आता त्यांनी मोठे पाऊल उचलले आहे.

बांगलादेश सरकारने जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग इंडियन प्रीमियर लीगच्या प्रसारणावर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. या निर्णयामुळे बांगलादेशमधील आयपीएलप्रेमी क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात अबूधाबी येथे झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये केकेआरने मुस्तफिझूर रहमानला ९.२० कोटी रुपयांना विकत घेतले होते. बांगलादेशच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने ५ जानेवारी रोजी देशातील सर्व टेलिव्हिजन चॅनल्सना आयपीएलचे प्रसारण तत्काळ थांबवण्याचे आदेश दिले. हा आदेश अधिकृत पत्राद्वारे देण्यात आला आहे.

या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, बीसीसीआयने कोणतेही ठोस कारण न देता बांगलादेशचा स्टार खेळाडू मुस्तफिझूर रहमान याला आगामी आयपीएल हंगामातून बाहेर काढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकारामुळे बांगलादेशच्या जनतेमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत आयपीएलचे सर्व सामने आणि संबंधित कार्यक्रमांचे प्रसारण त्वरित बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

भारतात जाणार नाही बांगलादेश संघ

यापूर्वीच बांगलादेशने टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतात न जाण्याचा अधिकृत निर्णय घेतला आहे. यामुळे दोन्ही देशांतील संबंध आणखी ताणले गेले आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे पत्र लिहून बांगलादेशचे सर्व सामने भारताऐवजी श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली आहे. सध्या नियोजनानुसार, बांगलादेशचे पहिल्या तीन लीग सामने कोलकात्यात तर चौथा सामना मुंबईत होणार आहे.

राजकीय तणावही कारणीभूत

उल्लेखनीय बाब म्हणजे, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरून हटवण्यात आल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध अधिकच तणावपूर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सरकारविरोधी आंदोलनांनंतर शेख हसीना भारतात आल्या होत्या. त्यानंतर बांगलादेशमध्ये भारतविरोधी भावना आणि आंदोलनांना उधाण आले आहे.

Comments
Add Comment