जीवनगंध : पूनम राणे
गुरुवारचा दिवस होता. नवीन वर्षाचा पहिला दिवस. जिकडे तिकडे उत्साही वातावरण दिसत होते. चाळीचाळींत, नगरामध्ये, मोठ्या मोठ्या इमारतींमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. नवीन वर्षाचे स्वागत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करीत होता. बाजारपेठा सजल्या होत्या. दिव्यांच्या रोषणाईने अवघ्या शहराचे रूपच पालटले होते. रोशन इयत्ता सातवीत शिकणारा विद्यार्थी. त्याच्या आजीचा भाजी विक्रीचा धंदा होता. चारचाकी गाडीवर आजी भाजी लावत असे. रोशनने आज गाडी विविध रंगीबेरंगी फुगे लावून सजवली होती. हॅप्पी न्यू इयर असे लिहून विद्युत रोषणाई केली होती. रोशनची भाजी विक्रीची गाडी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. नुकतीच मळ्यातून काढून आणली असावी अशी हिरवीगार टवटवीत भाजी रोशनच्या आजीच्या गाडीवर होती. भाजी मार्केटमधील प्रत्येक जण आपल्या मालाची विक्री करण्यासाठी आपापल्या परीने भाजी घ्या.... भाजी... मुळा घ्या... मेथी घ्या... असे ओरडत होते.
“बेटा, मुळा भाजीची जुडी कशी दिलीस?” असे शीला मावशी विचारत होत्या. मावशी, “दोन जुड्यांची किंमत ३० रुपये. एक घेतली तर २० रुपये.” शीला मावशीने ३० रुपये आजीच्या हातावर ठेवले. रोशनने भाजीची पिशवी सुशीला मावशीच्या हातात दिली. मावशीला एवढ्यात फोन आला आणि फोनवर बोलण्याच्या नादात मावशी रोशनच्या गाडी समोरून पुढे निघून गेल्या. पाठीमागून रोशनने आवाज दिला मावशी... मावशी... मावशी मोबाईलवर बोलण्यात गुंग होत्या. रोशन त्यांच्या मागून निघाला. मावशी... मावशी... मी आपल्या पिशवीत एकच जुडी दिली आहे आणि आपण मला तीस रुपये दिले आहेत. एक जुडी घेऊन जा असे म्हणून रोशनने एक जुडी मावशीच्या पिशवीत ठेवली. मावशीला खूप आनंद झाला.
शीला मावशी म्हणाल्या, ‘रोशन तू खूप चांगला मुलगा आहेस.’ नाही तर आजच्या काळात फसवणारी माणसे जास्त दिसतात. आजच्या युगात प्रामाणिक माणसांचा तुटवडा आहे .‘मावशी १० आणि २० रुपयांनी काय होणार!’ उलट मी तुम्हाला फसवलं म्हणून मी कायम माझा अपराधी ठरेल. माझे मन मला स्वस्थ बसू देणार नाही. नुकतीच शाळेला नाताळाची सुट्टी लागली. त्यापूर्वी आमच्या शाळेतील बाईंनी आम्हाला नवीन वर्षाचा संकल्प करायला सांगितला होता. मी संकल्प केला आहे आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. वार गुरुवार आहे. दत्त महाराजांवर माझी अत्यंत श्रद्धा आहे. त्यामुळे मी सकाळी त्यांना, आई-वडिलांना नमस्कार करून संकल्प केला आहे. प्रामाणिक आणि चांगला वागण्याचा प्रयत्न करणार आहे. ‘त्याचे बोलणे ऐकून शीला मावशीला अत्यंत आनंद झाला. शीला मावशी म्हणाल्या,’ अरे इतक्या लहान वयात तू आजीला मदत करतोयस. ही फार मोठी गोष्ट आहे. शाळेत शिकवलेल्या पुस्तकी पाठ्यपुस्तकातील ज्ञानापेक्षा इथे खरे जीवन शिक्षण मिळते आहे.
कोणतेही काम कमी दर्जाचे नसते. कोणत्याही केलेल्या नवीन कामातून आपण अनुभवसंपन्न होत असतो. नवीन वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा!” तुझे सारे संकल्प सिद्धीला जावो, असा आशीर्वाद शीला मावशीने दिला. आजीला आपल्या नातवाचे फार कौतुक वाटले. कौतुकाने ती त्याच्याकडे पाहत राहिली.
तात्पर्य : प्रत्येकाने नवीन वर्षात संकल्प केले पाहिजेत आणि ते पूर्णत्वाला कसे जातील यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे.






