Monday, January 5, 2026

'मुंबई सात वर्षांत झोपडपट्टीमुक्त करणार'

'मुंबई सात वर्षांत झोपडपट्टीमुक्त करणार'

ठाकरे बंधूंची युती म्हणजे कन्फ्युजन आणि करप्शनची युती

मुंबई : "पुढील ७ वर्षांत मुंबईला पूर्णपणे झोपडपट्टीमुक्त करून दाखवू", असा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कांदिवली येथे व्यक्त केला. "गेल्या १० वर्षांत आम्ही मुंबईचा चेहरामोहरा बदलला. आम्ही केवळ पायाभूत विकास केला नाही, तर मुंबईकरांचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवले. ओसी नसलेल्या इमारतींचा प्रश्न सोडवला. आता एसआरएच्या माध्यमातून झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या हक्काचे घर आम्हाला द्यायचे आहे. त्यासाठी आम्ही एक रोडमॅप तयार केला आहे. पुढच्या सात वर्षांत मुंबईला झोपडपट्टीमुक्त करू", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचवेळी ठाकरे बंधूंची युती म्हणजे कन्फ्युजन आणि करप्शनची युती असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

मुंबई पालिका निवडणुकीतील भाजप-महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कांदिवली येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्यासह मुंबईतील आमदार आणि वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. उबाठातून नुकत्याच भाजपत दाखल झालेल्या माजी महापौर शुभा राऊळ यांचे मुख्यमंत्र्यांनी पक्षात स्वागत केले. उबाठा आणि मनसेच्या संयुक्त वचननाम्याचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, "सकाळी एक वचननामा जाहीर झाला. काल माँसाहेब जिजाऊंची जयंती होती, त्या मुहुर्तावर कालच तो जाहीर करता आला असता. पण, वंदे मातरम् ची अँलर्जी असलेल्या लोकांसोबत आमचे जुने मित्र बसायला लागल्याने त्यांना अनेक अँलर्जी झाल्या आहेत. आमचे 'मामु' म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि नव्याने पुन्हा एकदा प्रेम उफाळलेले राज ठाकरे यांनी वचननामा जाहीर केला. वचननामा द्यायचा अधिकार फक्त हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना होता. पण, आज जाहीर झालेला वचननामा नाही तो वाचुननामा आहे. पण त्यांनी काय वाचले त्यांनाच कळले नाही. कारण, २०१७ च्या निवडणुकीत त्यांनी जी ५ वचने दिली, त्यातले एकही वचन पूर्ण करता आले नाही. खोटेच बोलायचे तर आईच्या चरणी तो जाहीरनामा कशाला ठेवायचा? २५ वर्षे काम केल्यावर नव्याने त्याच त्या गोष्टी सांगताना जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे", असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. दोन दिवसांपूर्वी दोन युवराजांनी राहुल गांधींसारखा एक शो केला. त्यात त्यांनी असे म्हटले की मुंबईत चांगल्या प्रकारचे शौचालय देखील नाही. पण, हे तुम्ही आम्हाला का विचारता? आपल्या बाबांना किंवा काकांना विचारा! २५ वर्षात मुंबई शौचालय तयार झाले नाही, त्याची उत्तरे बाबा किंवा काकांना विचारा! २५ वर्षे तुम्हाला खुप संधी मिळाली आता संधी नाही, असा घणाघात फडणवीस यांनी केला.

राज ठाकरे कुठल्या जेलमध्ये होते?

राज ठाकरे म्हणाले, की २० वर्षे झाले जेलमधून बाहेर आल्यासारखे वाटते. म्हणजे ते मातोश्रीहून शिवतीर्थावर गेले, ते शिवतीर्थ जेल समजायचे का? तुम्हाला जेलमध्ये घातले कोणी? कोणत्या गुन्ह्यात गेला होतात, आता शिक्षा संपली का? असे सवाल फडणवीसांनी केले. आज अनेकांनी मला सांगितले, की राज ठाकरें नेहमी सारखे राज ठाकरे वाटत नव्हते. मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलेलं आहे, हा प्रिती संगम नाही, भीतीसंगम आहे. महायुतीच्या भीतीने हे एकत्र आलेले आहेत. मला कुणीतरी म्हणाले, कार्टुनिस्ट आणि कॅमेरामनची युती झाली. मी म्हटले तसे म्हणणे योग्य नाही. मग आणखी कुणी सांगितले, की कॉमेडीयन आणि कॅमेरामनची युती झाली. मी म्हटले तसेही म्हणणे योग्य नाही. कोणाचे प्रोफेशन काहीही असू शकते, त्यावरून खिल्ली उडवणे योग्य नाही. ही युती ही कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे. एकजण कन्फ्युजड आहेत आणि दुसरा करप्ट लोकांचा नेता आहे. त्याविरुद्ध आमची युती कपॅसिटी आणि करेजची आहे. मुंबई बदलण्याचा ध्यास घेऊन युती आम्ही केली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठी माणूस नको, त्यांना चंगेज मुलतानी प्रिय

आता यांना आता मराठी माणूस नको आहे. चंगेज मुलतानी आणि रशीद मामू यांना जवळचा वाटतो. यांच्याकडे विकासावर बोलण्यासारखे काहीही नसल्याने, ते चकार शब्द काढत नाहीत. त्यामुळे मी जाहीर केलेली बक्षिसाची हजार रुपयांची रक्कम माझ्या खिशात पडून आहे. पण, यांनी आतातरी विकासावर बोलावे, यासाठी मी बक्षिसाची रक्कम दोन हजार रुपयांपर्यंत वाढवतो, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते म्हणाले, गेल्या १० वर्षांत आम्ही मुंबईत परिवर्तन केले, मुंबईचा चेहरामोहरा बदलला. पूर्वी झोपडपट्टीमुक्त मुंबईचा विचार केला जायचा, त्यावेळी इकडून काढून लांब कुठेतरी स्थलांतरित करायचे, अशी संकल्पना होती. पण, आम्ही आम्ही झोपडपट्टी मुक्त मुंबई करून दाखवूच, पण या गरीब मुंबईकराला त्याचे हक्काच घर त्याच ठिकाणी दिल्याशिवाय थांबणार नाही. आम्ही एक रोडमॅप तयार केला आहे. पुढच्या सात वर्षांत मुंबईला झोपडपट्टीमुक्त करू, असा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >