मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन योजना काढली आहे. योजनेनुसार ई- बस सेवेचा वापर वाढवण्यासाठी नवीन मासिक आणि त्रेमासिक पास योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य हेतु असा आहे की दररोज एकाच मार्गवर नोकरी , व्यवसाय अथवा शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांना कमी खर्चात अधिक सुविधा देणे हा आहे. या पास योजनेमुळे ई-बस सेवा अधिक किफायतशीर ठरणार असून प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहेत.
नवीन पास योजनेमुळे पैसे आणि वेळ दोन्ही वाचणार
एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की खासगी वाहनांचा वापर कमी करून जास्तीत जास्त प्रवाशांनी ई-बसमधून प्रवास करावा,यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. रोजच्या प्रवाशांना ई-बसकडे आकर्षित करणे हा या योजनेचा प्रमुख हेतू आहे.
सध्या MSRTC च्या ई-बस प्रकल्पांतर्गत ४४८ ई-बस कार्यरत असून शिवाई प्रकल्पामध्ये आणखी ५० ई-बस सेवा देत आहेत. येत्या काही महिन्यांत या बसची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा मानस असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली आहे. त्यामुळे भविष्यात अधिक मार्गांवर ई-बस सेवा सुरू होणार आहे. या योजनेत मासिक आणि त्रैमासिक असे दोन प्रकारचे पास उपलब्ध आहेत. मासिक पासमध्ये ३० दिवसांचा प्रवास कालावधी असून केवळ २० दिवसांचे भाडे भरावे लागणार आहे. तर त्रैमासिक पासमध्ये ९० दिवसांचा कालावधी असून ६० दिवसांचे भाडे भरल्यास संपूर्ण ९० दिवस प्रवास करता येणार आहे.
मुंबई-ठाणे-अलिबाग प्रवाशांसाठी खुशखबर!
मुंबई ते ठाणे, अलिबाग यांसारख्या जवळच्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात दैनंदिन प्रवासी प्रवास करतात. या मार्गांवर आधीपासूनच ई-बस सेवा सुरू असल्यामुळे नवीन पास योजनेचा थेट फायदा या प्रवाशांना होणार आहे. प्रवास अधिक सोपा, सुरक्षित आणि स्वस्त होईल, असा विश्वास महामंडळाने व्यक्त केला आहे.
ही पास योजना ९ मीटर आणि १२ मीटर ई-बस तसेच ई-शिवाई बस सेवेसाठी लागू असणार आहे. त्यामुळे नियमित ई-बस प्रवाशांना या योजनेचा मोठा दिलासा मिळणार आहे.