Saturday, January 3, 2026

प्रशासनाचा भोंगळ कारभार! मृत शिक्षकाला लावली निवडणूक ड्युटी

प्रशासनाचा भोंगळ कारभार! मृत शिक्षकाला लावली निवडणूक ड्युटी

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील दोन मृत व्यक्तींना मतदान अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. तर याप्रकरणातील ट्विस्ट म्हणजे महानगरपालिका निवडणुकीच्या कामावर गैरहजर राहिलेल्या मृत कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी नोटीस बजावली आहे. २८ डिसेंबर, २०२५ रोजी सुमारे १२०० कर्मचाऱ्यांना या नोटिसा पाठवण्यात आल्या. मात्र, या यादीत दोन मृत कर्मचाऱ्यांचाही समावेश झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दोन्ही मृत शिक्षकांच्या मृत्यूची माहिती प्रशासनाकडे सादर करूनही, ते निवडणूक कामावर गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवत कारवाईची नोटीस काढण्यात आल्याने संबंधित कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

महानगरपालिकेच्या वतीने महापालिका निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. २८ डिसेंबर रोजी त्यांचा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. ज्यात सुमारे दोन हजार कर्मचारी अनुपस्थित राहिले होते. त्यापैकी सुमारे १२०० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, या यादीत दोन मृत शिक्षकांचाही समावेश झाल्याचा प्रकार समोर आला आहे. महापालिका निवडणुकीसाठी मतदान अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आलेल्या या दोन शिक्षकांपैकी एकाचा १३ महिन्यांपूर्वी तर दुसऱ्याचा ३ महिन्यांपूर्वी मृत्यू झाला आहे. तरीही प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्याबद्दल त्यांना नोटीस बजावून कारवाईचा इशाराही देण्यात आला.

पैठण तालुक्यातील संभाजी कर्डिले यांचे ३ महिन्यांपूर्वी, तर राजेश बसवे यांचे १३ महिन्यांपूर्वी निधन झालेले असतानाही त्यांना निवडणूक कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. या मृत शिक्षकांना निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने संताप व्यक्त करत संबंधित सर्व कागदपत्रे सादर करूनही निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती कशी करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या प्रशिक्षणासाठी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, रेल्वे स्टेशन रोड, उस्मानपुरा, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, उस्मानपुरा, एमआयटी कॉलेज, बीड बायपास रोड तसेच, मुख्य नाट्यगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे प्रशिक्षण केंद्रं निश्चित करण्यात आली होती. मात्र, एकूण ८ हजारांपैकी २०१६ मतदान अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षणासाठी अनुपस्थित राहिल्याने सुमारे १२०० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अनुपस्थित कर्मचाऱ्यांना नोटीस देण्याचे निर्देश आयुक्त तथा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले होते.

मनपा उपायुक्त राहुल सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विधानसभा निवडणुकीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांची यादी मागवण्यात आली होती. यादी प्राप्त झाल्यानंतर मृत कर्मचारी तसेच, बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची नावं वेगळी करण्यात आली होती. मात्र, निवडणूक जाहीर झाल्यानंतर तयारीसाठी उपलब्ध वेळ कमी असल्याने ही तांत्रिक चूक झाली आणि त्यामुळे हा प्रकार घडला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा