Wednesday, December 31, 2025

कडोंमपा, पनवेल आणि धुळ्यात भाजपने उधळला गुलाल!

कडोंमपा, पनवेल आणि धुळ्यात भाजपने उधळला गुलाल!

डोंबिवली: महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवार ३० डिसेंबर रोजी संध्याकाळी संपली आहे. आता अर्जांची छाननी सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपने खातं उघडून दमदार सुरुवात केल्याची बातमी सकाळी मिळाली. पाठोपाठ भाजपने धुळ्यात आणि पनवेलमध्येसुद्धा खाते उघडले. धुळ्यात आणि पनवेलमध्ये भाजपचा प्रत्येकी एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. त्यामुळे आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचे अर्थात भाजपचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

आसावरी केदार नवरे यांनी पॅनल क्रमांक २६ (क) मधून खुल्या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. तर रेखा चौधरी यांनी पॅनल क्रमांक १८ (अ) मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांचीही निवड बिनविरोध झाली आहे. दरम्यान दुसरीकडे पनवेल महापालिकाच्या प्रभाग क्रमांक १८ (ब) मधून नितीन पाटील आणि धुळे महापालिकेतून उज्वला भोसले हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज छाननी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष असलेले रणजीत राजे भोसले यांनी काल तडकाफडकी पक्षाचा राजीनामा देत शेवटच्या क्षणी भाजपात प्रवेश केला. तसेच पत्नी उज्वला भोसले यांना भाजपाचे तिकीट मिळवून दिले.  अर्ज छाननी दरम्यान त्यांच्या विरोधात असलेल्या चारही उमेदवारांचे नामांकन अर्ज बाद झाल्याने त्या बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे, धुळे मनपातील 'त्या' पहिल्याच नगरसेविका म्हणून बिनविरोध निवडून आल्या आहे. विशेष म्हणजे आदल्या दिवशी भाजप प्रवेश केला अन् दुसऱ्याच दिवशी नगरसेवक बनल्याचा वेगळाच रेकॉर्ड त्यांच्या नावावर तयार झाला आहे.

महायुती म्हणून शिवसेना ६६ आणि भाजप ५६ जागांवर लढत आहे. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस ४२ जागांवर स्वबळावर लढत आहे. मनसे आणि उबाठाने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे ५४ तर उबाठा ६८ जागांवर निवडणूक लढवत आहे. जागावाटपाचा तिढा सुटला असला तरी सर्वच पक्षांसमोर कमी जास्त प्रमाणात बंडखोरांना शांत करण्याचे आव्हान आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा