Tuesday, December 30, 2025

६२१ कोटी खर्चूनही मुंबई-अहमदाबाद महामार्ग खड्ड्यांतच!

६२१ कोटी खर्चूनही मुंबई-अहमदाबाद महामार्ग खड्ड्यांतच!

व्हाईट टॉपिंगच्या निकृष्ट कामामुळे वाहतूक कोंडी

वसई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी तब्बल ६२१ कोटी रुपये खर्च करण्यात आले असले, तरी महामार्गाची अवस्था अद्याप सुधारलेली नाही. व्हाईट टॉपिंगच्या कामात झालेल्या निष्काळजीपणा आणि निकृष्ट दर्जामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

गेल्या चार दिवसांपासून रात्रीच्या वेळेत महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दिवसा काही प्रमाणात दिलासा मिळत असला, तरी रात्री १२ ते १५ किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प होते. नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमुळे मुंबई, उपनगर तसेच गुजरातकडून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्याचा थेट परिणाम महामार्गावरील वाहतुकीवर होत आहे.

आपत्कालीन सेवांवरही परिणाम

वाहतूक कोंडीचा परिणाम रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या आपत्कालीन सेवांवरही होत आहे. मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे माजी आयुक्त मधुकर पांडे यांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महामार्गावर एक समर्पित झोन तयार केला होता. दिवसा पोलीस तैनातीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला, मात्र रात्री परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे.

नियोजनशून्य कामामुळे प्रवाशांचे हाल

दरम्यान, वाहतूक विभागाचे डीसीपी अशोक विरकर यांनी महामार्गावर सुमारे ५० वाहतूक पोलीस अधिकारी तैनात करण्यात आल्याची माहिती दिली असून, खानिवडे टोल प्लाझाजवळ जड वाहने थांबवण्याची कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. महामार्गाच्या निकृष्ट दुरुस्तीमुळे आणि नियोजनशून्य कामामुळे प्रवाशांचे हाल होत असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई आणि तातडीने दर्जेदार दुरुस्तीची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

कत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे निकृष्ट काम : वर्सोवा खाडीवरील जुन्या पुलावर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी कोंडी होत असल्याचे वृत्त आहे. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) गुजरात सीमेपासून काशिमीरापर्यंत महामार्गावर व्हाईट टॉपिंग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अधिकाऱ्यांची उदासीनता आणि कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे कामाचा दर्जा खालावला. परिणामी, अल्पावधीतच रस्त्यावर खड्डे पडले आणि अपघातांची संख्या वाढली.

सुट्टीच्या काळात काम न करण्याचे आदेश कागदापुरते

सुट्टीच्या काळात महामार्गांवर काम न करण्याचे एनएचएआयचे आदेश असतानाही, जुन्या वर्सोवा खाडी पुलाचे काँक्रिटीकरण सुरूच ठेवण्यात आले. प्रभावी नियोजनाअभावी गेल्या चार दिवसांपासून १५ ते २० किमी लांबीची वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. एनएचएआयचे अधिकारी सुहास चिटणीस यांनी सांगितले की, कोंडी नियंत्रणासाठी २० ते २५ वॉर्डन तैनात करण्यात आले आहेत. मात्र, वाहनचालकांच्या म्हणण्यानुसार रात्रीच्या वेळेत हे वॉर्डन प्रत्यक्षात दिसत नाहीत.

Comments
Add Comment