आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री भीषण रेल्वे अपघात घडला. विशाखापट्टणमच्या दुव्वाडा येथून एर्नाकुलमकडे जाणाऱ्या टाटा–एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस (क्रमांक १८१८९) च्या दोन एसी कोचमध्ये अचानक आग लागली. एलामंचिली रेल्वे स्थानकाजवळ रात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते. पँट्री कारजवळील बी-१ आणि एम-२ या एसी कोचमध्ये ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत दोन्ही डबे पूर्णपणे आगीत जळून खाक झाले होते. या दुर्घटनेत अनेक प्रवासी होरपळले असून एकाचा मृत्यू झाला आहे.
ट्रेनमध्ये गोंधळाचे वातावरण
मध्यरात्री ट्रेन एलामंचिली स्थानकाच्या दिशेने येत असतानाच एका कोचमधून आगीच्या ज्वाळा उसळू लागल्या. काही क्षणांतच आग दुसऱ्या कोचमध्ये पसरली. धुरामुळे आणि आगीच्या तीव्र उष्णतेमुळे प्रवाशांना श्वास घेणे कठीण झाले. आग लागल्याचे लक्षात येताच ट्रेनमध्ये खळबळ उडाली. घाबरलेल्या प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव करत ट्रेनमधून बाहेर पडत स्थानक परिसरात आश्रय घेतला. संपूर्ण परिसर धुराने वेढलेला होता. अनाकापल्ली, एलामंचिली आणि नक्कापल्ली येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी दाखल होऊन मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली.
आगीचे कारण काय?
प्राथमिक तपासात बी-१ एसी कोचमध्ये ब्रेक जाम झाल्यामुळे ही आग लागल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेत बी-१ कोचमध्ये प्रवास करणारे विशाखापट्टणम येथील ७० वर्षीय चंद्रशेखर सुंदर यांचा होरपळून मृत्यू झाला. याशिवाय सुमारे २० ते २२ प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेचा परिणाम विशाखापट्टणम–विजयवाडा रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर झाला असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पहाटे ३.३० नंतर पर्यायी गाड्या आणि बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री वंगालपुडी अनिता यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी अधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली असून जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. रेल्वे सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.






