Sunday, December 28, 2025

३० कोटींच्या फसवणूक प्रकरणात विक्रम भट्ट अडचणीत, कोर्टाने जामीन अर्ज पुन्हा फेटाळला

३० कोटींच्या फसवणूक प्रकरणात विक्रम भट्ट अडचणीत, कोर्टाने जामीन अर्ज पुन्हा फेटाळला

मुंबई : दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट यांना न्यायालयाकडून पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित ३० कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणात उदयपूर न्यायालयाने दोघांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. याआधीही डिसेंबर महिन्यात त्यांचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा दाखल करण्यात आलेल्या अर्जालाही न्यायालयाने नकार दिला आहे.

जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने तपास सध्या अत्यंत संवेदनशील टप्प्यावर असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणात पुढील अटक आणि अधिक चौकशीची शक्यता असून, या अवस्थेत जामीन मंजूर केल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे, करार आणि पैशांच्या हालचालींचा तपास अद्याप सुरू असल्याचेही कोर्टाने नमूद केले आहे.

तपास पूर्ण झालेला नसल्यामुळे या प्रकरणात आणखी काही व्यक्तींची चौकशी होण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या जामीन देणे योग्य ठरणार नाही, असा स्पष्ट निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

इंदिरा ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक डॉ. अजय मुरडिया यांनी विक्रम भट्ट, त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट आणि इतर सहा जणांविरोधात ३० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप केला आहे. डॉ. मुरडिया यांना त्यांच्या दिवंगत पत्नीवर आधारित बायोपिक तयार करायचा होता. त्यासाठी त्यांनी दिनेश कटारिया यांच्याशी संपर्क साधला होता.

कटारिया यांच्या माध्यमातून २५ एप्रिल २०२४ रोजी डॉ. मुरडिया यांची मुंबईतील वृंदावन स्टुडिओमध्ये विक्रम भट्ट यांच्याशी भेट झाली. या भेटीत विक्रम भट्ट यांनी चित्रपट निर्मितीचे आश्वासन देत प्रकल्पासाठी पैसे पाठवण्यास सांगितले. यावेळी त्यांच्या पत्नी आणि मुलगी या प्रकल्पात सहयोगी म्हणून सहभागी असतील, असेही सांगण्यात आले होते.

मात्र नंतर या संपूर्ण व्यवहारामागे फसवणूक असल्याचे उघड झाले. बायोपिकच्या नावाखाली डॉ. मुरडिया यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणात विक्रम भट्ट आणि श्वेतांबरी भट्ट यांना ७ डिसेंबर रोजी मुंबईतून अटक करण्यात आली होती. राजस्थान पोलिसांनी ट्रान्झिट रिमांड मिळवल्यानंतर ९ डिसेंबर रोजी दोघांना उदयपूर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणावर अद्याप विक्रम भट्ट किंवा श्वेतांबरी भट्ट यांची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Comments
Add Comment