मुंबईसह २९ महापालिकांमध्ये तोफा धडाडणार; विरोधकांच्या नॅरेटीव्हला चोख उत्तर देणार
मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना, आता प्रखर हिंदुत्ववादी नेत्यांच्या तोफा या शहरांत धडाडणार आहे. मुंबईसह पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आदी शहरांमध्ये हिंदुत्ववादी नेत्यांच्या प्रचारसभांना प्रचंड मागणी वाढली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सभा मिळवण्यासाठी महायुतीचे उमेदवार पक्ष नेतृत्वाकडे जोरदार मागणी करू लागले आहेत.
मतदारांचा हिंदुत्वाकडे वाढता कल लक्षात घेऊन उमेदवारांना हिंदुत्ववादी नेत्यांच्या सभांची गरज भासत आहे. विशेषतः मुंबई, वसई-विरार, मिरा-भाईंदर, भिवंडी, नाशिक, पुणे-पिंपरी चिंचवड, आहिल्यानगर, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या महानगरपालिकांमध्ये नितेश राणे यांच्या सभांना सर्वाधिक मागणी आहे. याशिवाय योगी आदित्यनाथ आणि पवन कल्याण यांच्या सभाही उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रभावी ठरणार असल्याचे मानले जात आहे.
ठाकरे बंधूंच्या 'मराठी विरुद्ध अमराठी' नॅरेटिव्हला प्रत्युत्तर देण्यासाठी महायुतीची ही रणनीती प्रभावी ठरणार आहे. उबाठा आणि मनसेच्या मराठी अस्मितेच्या मुद्द्याला हिंदुत्वाच्या व्यापक नॅरेटिव्हने रोखण्याचा प्रयत्न महायुतीकडून होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अलीकडच्या भाषणांत हिंदुत्वाशी कोणतीही तडजोड न करण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणेच पालिका निवडणुकीतही हा पॅटर्न अवलंबला जाणार आहे.
उबाठाची अल्पसंख्याकांना साद
दुसरीकडे, उबाठा गट अल्पसंख्यांक समाजाला जवळ करण्यासाठी धडपड करत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगलीशी संबंधित आरोपी रशीद मामू याला सोबत घेण्यात आले. मुंबईतही असेच प्रयोग पूर्वी झाले आहेत. हा मुद्दा हेरून महायुतीचे हिंदुत्ववादी नेते उबाठा आणि मनसेला लक्ष्य करणार आहेत. येत्या ३ जानेवारीनंतर मुंबई आणि आसपासच्या परिसरात योगी आदित्यनाथ, नितेश राणे आदी नेते प्रचारासाठी धडकणार असल्याची माहिती समोर आली आहे.






