Saturday, December 27, 2025

श्रीलंकेविरूद्धच्या खेळीत शेफाली अव्वल! भारतीय महिला क्रिकेट 'टी 20'च्या इतिहासात ठरली वेगवान अर्धशतक करणारी तिसरी फलंदाज

श्रीलंकेविरूद्धच्या खेळीत शेफाली अव्वल! भारतीय महिला क्रिकेट 'टी 20'च्या इतिहासात ठरली वेगवान अर्धशतक करणारी तिसरी फलंदाज

तिरुवनंतपुरम: भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर टी 20 मध्येही उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवली आहे. काल झालेल्या भारत विरूद्ध श्रीलंका तिसऱ्या टी 20 सामन्यात भारताने ८ विकेट घेत श्रीलंकेला पराभूत केले. तिरुअनंतपुरम येथे खेळवल्या गेलेल्या या सामन्यामध्ये भारताच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला ११२ धावांवर रोखले. तर भारताने हे आव्हान १४ ओव्हरमध्येच पूर्ण केले. यामुळे आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने ३-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे. पण या सामन्यात केंद्र ठरली 'शफाली वर्मा'! तिने ४२ चेंडूंमध्ये ७९ धावांची खेळी करत भारताला मोठा विजय मिळवून दिला.

भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या गोलंदाजांपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांचा जास्त काळ टिकाव लागला नाही. सुरुवातीच्या ४५ धावांवर श्रीलंकेने ४ विकेट गमावल्या होत्या. इमेशा दुलानी २७ धावा आणि कविशा दिलहारी २० धावा असा भागीदारीचा खेळ करत श्रीलंकेने १०० धावांचा टप्पा पार केला. तर २० ओव्हरमध्ये श्रीलंकेने केवळ ११२ धावा केल्या.

भारताची सुरुवातही चांगली झाली नव्हती. स्मृति मानधना पहिल्या धावेनंतर लगेच बाद झाली. तर जेमिमा रॉड्रिग्ज देखील ९ धावा करुन बाद झाली. मात्र दुसरीकडे शफाली वर्माने फटकेबाजी सुरु ठेवत २४ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. भारतीय महिला क्रिकेट इतिहासातील टी 20 मधील हे तिसरे वेगवान अर्धशतक ठरले. शफाली वर्माने एकूण ४२ चेंडूंमध्ये ७९ धावा केल्या. ज्यात तिने ११ चौकार आणि ३ षटकार मारले. महत्त्वाचे म्हणजे शफाली वर्माने कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत ४८ धावांची भागीदारी करत विजय निश्चित केला.

दरम्यान कर्णधार हरमनप्रीत कौरच्या शिरपेचातही एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक सामने जिंकण्याचा मान तिला मिळाला आहे. आजपर्यंतच्या तिच्या श्रीलंकेविरुद्ध २० सामन्यांपैकी १६ सामने तिने जिंकले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर चार्लोट एडवर्ड्स असून तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २४ पैकी १४ सामने जिंकले आहेत. यामुळे हरमनप्रीत महिला टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार ठरली आहे. हरमनप्रीतने आतापर्यंत कर्णधार म्हणून १३० पैकी ७७ सामने जिंकले असून तिने ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगला मागे टाकले आहे.

Comments
Add Comment