ऑस्ट्रेलियात इंग्लंडचा विजय, मेलबर्न कसोटी दोन दिवसांत संपली

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या 'ॲशेस' मालिकेतील 'बॉक्सिंग डे' कसोटी सामन्याचा निकाल अवघ्या दोन दिवसांत लागून क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या या चौथ्या कसोटीत गोलंदाजांचे अभूतपूर्व वर्चस्व पाहायला मिळाले. इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर ४ गडी राखून सनसनाटी विजय मिळवत मालिकेत ३-१ अशी पिछाडी भरून काढली आहे.


नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो अत्यंत योग्य ठरला. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना खेळपट्टीवर टिकू दिले नाही. जोश टंगच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव केवळ १५२ धावांवर गुंडाळला. जोश टंगने पहिल्या डावात ५ महत्त्वाचे बळी घेतले.


मात्र, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनीही आपले वर्चस्व दाखवून दिले. मायकेल नेसर आणि स्कॉट बोलँड यांच्या घातक माऱ्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या ११० धावांत आटोपला.


४२ धावांची आघाडी घेतलेल्या ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात इंग्लंडने १३२ धावांवर रोखले. विजयासाठी १७५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडने हे आव्हान ६ गडी गमावून पूर्ण केले आणि मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तब्बल १५ वर्षांनंतर कसोटी विजय नोंदवला. यापूर्वी इंग्लंडने ऑस्ट्रेलियात शेवटचा कसोटी सामना २०११ मध्ये पर्थ येथे जिंकला होता . त्यानंतर तब्बल १४-१५ वर्षे इंग्लंडला ऑस्ट्रेलियात एकाही कसोटी सामन्यात विजय मिळवता आला नव्हता. या काळात झालेल्या २०१३-१४, २०१७-१८ आणि २०२१-२२ च्या तिन्ही ॲशेस दौऱ्यांत इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाने धुव्वा उडवला होता. त्यामुळे हा विजय १५ वर्षांनंतर मिळालेले ऐतिहासिक यश आहे. या विजयामुळे इंग्लंड संघात उत्साहाचे वातावरण असून, मालिकेतील शेवटचा सामना आता ४ जानेवारी २०२६ पासून सिडनी येथे खेळवला जाईल.


अॅशेस इतिहासात दोन दिवसांत संपलेले सामने


वर्ष - मैदान
१८८८ - लॉर्ड्स,
१८८८ - द ओव्हल,
१८८८ - मँचेस्टर,
१८९० - द ओव्हल,
१९२१ - नॉटिंगहॅम,
२०२५ - पर्थ,
२०२५ - मेलबर्न.


रूट-स्टोक्ससाठी ऐतिहासिक क्षण


संपूर्ण इंग्लंड संघासाठी ऑस्ट्रेलियन भूमीवरील हा पहिला विजय असला तरी, बेन स्टोक्स आणि जो रूटसाठी हे विशेष महत्त्वाचे आहे. ऑस्ट्रेलियन भूमीवरील हा त्यांचा पहिलाच कसोटी विजय आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक दौऱ्यात पराभव किंवा अनिर्णित सामना राहिला होता.



मेलबर्नच्या खेळपट्टीवर दोन्ही कर्णधारांची टीका


ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळली गेलेली अॅशेस मालिकेतील चौथी कसोटी अवघ्या दोन दिवसांत संपल्याने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. यावरून इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ या दोघांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली असून, "दोन दिवसांत सामना संपणे हे कसोटी क्रिकेटसाठी चांगले लक्षण नाही," अशी भावना व्यक्त केली आहे.


बॉक्सिंग डे कसोटीसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवर १० मिमी गवत ठेवण्यात आले होते. यामुळे चेंडूला इतकी अनपेक्षित हालचाल मिळाली की, दोन दिवसांच्या खेळात तब्बल ३६ गडी बाद झाले. फलंदाजांना खेळपट्टीवर टिकणे अशक्य झाले होते, ज्यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली.


सामन्यानंतर बोलताना बेन स्टोक्स म्हणाला, "प्रामाणिकपणे सांगायचे तर, कसोटी क्रिकेटला अशा स्वरूपाच्या खेळपट्ट्यांची गरज नाही. जर हीच खेळपट्टी जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात (आशियाई देशांत) असती, तर त्यावर आतापर्यंत कडक टीका झाली असती. प्रेक्षक पाच दिवसांचा खेळ पाहण्यासाठी पैसे खर्च करतात, दोन दिवसांत खेळ संपणे दुर्दैवी आहे."


ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनेही खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तो म्हणाला, "दोन दिवसांत ३६ बळी पडणे हे अतिशय जास्त आहे. फलंदाजांना स्थिरावण्याची संधीच मिळाली नाही. कदाचित गवताचे प्रमाण थोडे कमी ठेवले असते, तर फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात चांगला समतोल पाहायला मिळाला असता.


ऑस्ट्रेलियाला आर्थिक फटका


हा सामना दोन दिवसांत संपल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. पुढील तीन दिवसांच्या तिकिटांचे पैसे प्रेक्षकांना परत करावे लागणार असल्याने बोर्डाचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी टॉड ग्रीनबर्ग यांनीही "दोन दिवसांच्या कसोटी व्यवसायासाठी घातक आहेत," असे स्पष्ट केले आहे. या विजयामुळे इंग्लंडने मालिकेत पुनरागमन केले असले तरी, मेलबर्नच्या खेळपट्टीच्या दर्जावर आता आयसीसी काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Comments
Add Comment

RR won : लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा चौकार, राजस्थान रॉयल्सची विजयासह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप

लखनौ : रिषभ पंतच्या लखनौ सुपर जायंट्सला सोपा सामनाही जिंकता आला नाही. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील राजस्थान

MI- CSK IPL 2026 : मुंबई-चेन्नई सामन्यात धोनी खेळण्याची शक्यता; विल जॅक्स मुंबई इंडियन्स संघात दाखल

मुंबई : वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणाऱ्या आयपीएल २०२६ च्या

IPL 2026 Tilak Varma : तिलक वर्माच्या शानदार शतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा विजय

अहमदाबाद :  तिलक वर्माची स्फोटक फलंदाजी आणि अश्विनी कुमारच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने गुजरात

BCCI New Plan : एकाच वेळी दोन मोठ्या स्पर्धांमध्ये उतरणार भारतीय संघ; श्रेयस अय्यर करणार नेतृत्व?

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) एकाच वेळी दोन स्पर्धात्मक टी-२० स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतील अशा

ETPL Abhishek Bachchan's Team : अभिषेक बच्चन यांच्या नेतृत्वाखालील ETPL ची ग्लासगो फ्रँचायझीची घोषणा; ख्रिस गेल आणि मुगाफी ग्रुपकडे संघाची मालकी

युरोपमधील पहिली आयसीसी-मान्यताप्राप्त T20 स्पर्धा ‘युरोपियन T20 प्रीमियर लीग’ (ETPL)ने आपल्या ग्लासगो-स्थित फ्रँचायझी

Indian Women's Team : भारतीय महिला संघाचा सलग दुसरा पराभव, द. आफ्रिकेचा ८ विकेट्सने विजय

डर्बन : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील