Saturday, December 27, 2025

काँग्रेसचे ठरले, वंचित बहुजन आघाडीला सोडणार ६०पेक्षा अधिक जागा?

काँग्रेसचे ठरले, वंचित बहुजन आघाडीला सोडणार ६०पेक्षा अधिक जागा?

यंदा महापालिकेत वंचितचे खाते उघडण्याची दाट शक्यता

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी उबाठा शिवसेनेने आघाडीची साथ सोडल्याने आता काँग्रेस पक्षाने एकला चलो रेचा नारा दिला होता. परंतु काँग्रेसचे मागील काही वर्षांत झालेले अध:पतन लक्षात घेता अनेक ठिकाणी त्यांना उमेदवारही मिळत नाही. त्यामुळे अखेर वंचित बहुजन आघाडीसोबत जुळवून घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजनमधील आघाडी निश्चित झाली असून वंचितच्या वाट्याला साठ पेक्षा अधिक जागा जाण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस पक्षाकडून मुंबईतील साठ पेक्षा अधिक जागा सोडण्याची तयारी दर्शवली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे काँग्रेससोबत वंचित बहुजन गेल्यास यंदा महापालिकेत वंचितचे खाते उघडले जाण्याची दाट शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उबाठा शिवसेना आणि मनसे एकत्र आले असून भाजपा आणि शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती आहे. त्यामुळे मनसे उबाठासोबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) गेल्यामुळे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने स्वबळाव निवडणूक लढण्याचा निर्धार केला. मात्र, आता वंचित बहुजन आघाडीच्यावतीने काँग्रेससोबत आघाडीची तयारी दर्शवल्यामुळे दोन्ही वाटपातील जागा वाटपांवर शिक्कामोर्तब व्हायचे आहे. काँग्रेसने सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीला ४८ जागा देण्यास तयारी दर्शवली होती. परंतु या जागा कमी असल्याने अधिक जागांची मागणी केली होती. परंतु आता काँग्रेस पक्षाने, वंचितला मुंबईतील ६० जागा सोडण्याचा निश्चय केल्याची माहिती मिळत आहे. वंचितला सोडण्यता येणाऱ्या साठ जागांवर जवळपास एकमत झाल्याची माहिती मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीची स्थापना २०१९ची असल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत ते प्रथमच उतरणार आहेत. सन २०१९ आणि त्यानंतरच्या २०२४ लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली असली तरी प्रथमच मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेत काँग्रेस पक्षाच्या मदतीने उबाठा शिवसेनेचे उमेदवार निवडून आल्यानंतर उबाठाने काँग्रेसची साथ सोडली आहे. परंतु काँग्रेसला साथ देण्यास प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी पुढे आली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजनचे मतदान एकत्र झाल्यास काँग्रेसच्या उमेदवारांचे मतदान वाढले जाणार आहे. त्यामुळे दोन्हींच्या एकत्रित मतदानामुळे काँग्रेसचा आणि पर्यायाने वंचितचा फायदा होवू शकेल. यंदाच्या महापालिकेत वंचितचा नगरसेवक काँग्रेसच्या मदतीने निवडून येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
Comments
Add Comment