Thursday, December 25, 2025

१६ जानेवारीला आपण अटलजींना खरी आदरांजली द्यायची आहे" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

१६ जानेवारीला आपण अटलजींना खरी आदरांजली द्यायची आहे

मुंबई : आज संपूर्ण देशभरात अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या निमित्त भाजपा मुंबईच्या वतीने संपूर्ण मुंबई शहरात वेगवेगळ्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून 'चित्र-चरित्र प्रदर्शनी'चे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या शुभहस्ते वसंतस्मृती कार्यालय, दादर येथे करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात ढोलताशांच्या गजरात मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताने झाली. त्यानंतर भाजपा महिला मोर्चाकडून औक्षण करण्यात आले.

मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस आणि भाजपा मुंबई अध्यक्ष आणि आमदार मान. श्री अमित साटम यांनी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालत आदरांजली वाहिल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. भाजपा मुंबई अध्यक्ष आणि आमदार मान. श्री अमित साटम यांच्या प्रास्ताविक भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले, "मागच्या ११ वर्षांत देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला 'सुशासन' नेमकं काय असतं हे दाखवून दिलं आहे. मुंबईतील मेट्रो, अटल सेतू, कोस्टल रोड आणि बीबीडी चाळीतील माणसाला ५६० चौरसफुटांचं घर ही सर्व कामे कोणी केली हे माहित आहे. देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने मागील ११ वर्षांत ज्या प्रमाणे काम केलं त्याने मुंबईकर प्रभावीत झालेले आहेत. त्यामुळे आगामी काळात मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकताना दिसेल. "

श्री अमित साटम यांच्या भाषणानंतर श्री. देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. यावेळी त्यांनी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यपद्धती इतिहास आणि देशासाठी त्यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांबद्दल उत्स्फुर्तपणे सांगितले.

ते म्हणाले, "भारतमातेच्या या सुपुत्राने जवळपास ५ दशकांपर्यंत या देशाला दिशा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि आपले पंतप्रधान मान. नरेंद्र मोदी यांनी जो नवभारत तयार केला. त्या नवभारताचा पाया रचणारे श्रद्धेय भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी होते. या भारतीय जनता पार्टीला त्यांनी विपरीत काळामध्ये दिशा दिली आणि हिंदुत्त्वाच्या संकल्पनेच्या व्यापक विचारांशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही. पहिल्यांदा परराष्ट्रमंत्री झाल्यानंतर भारताचं परराष्ट्र धोरण अटलजींनी परिभाषित केलं तेच धोरण आजही महत्त्वाचं मानलं जातं."

ते पुढे म्हणाले, "देशामध्ये पंतप्रधान म्हणून अटलजींनी केलेलं कार्य हे अविस्मरणीय आहे. ते नेहमी म्हणायाचे 'रस्ते हे देशाला एकात्मतेकडे नेतात' आणि त्यांच्याच संकल्पनेतून देशाला वर्ल्डक्लास हायवे पाहायला मिळाले. त्यांनी पहिल्यांदा प्रधानमंत्री ग्रामसडक योजना देशात सुरु केली. ज्यामुळे शहरे गावांशी जोडली गेली. भारत देश अणुसंपन्न करण्याचं काम त्यांनी केलं. मोठ्या राष्ट्रांकडून दबाव येत असताना अटलजी त्यांच्या निर्णायावर ठाम राहिले आणि आज भारत एक बलवान देश म्हणून उभा आहे. एवढंच नाही तर अटलजींच्या काळात देशाची अर्थव्यवस्था १० टक्क्यांपर्यंत वाढली. अणुस्फोटानंतर जगाने बहिष्कृत केलेल्या आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला ठामपणे उभं करणारे अटलजी होते."

श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अटलजींनी ज्या प्रकारे भाजपा मुंबईमध्ये सुरुवात करून दिली होती त्याचप्रमाणे, पुन्हा एका मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता आणून अटलजींचे कार्य पुढे न्यायचे आहे. आपली लढाई ही मुंबईकरांची लढाई आहे. पारदर्शी आणि प्रामाणिकतेतून मुंबईची महानगरपालिका चालली पाहिजे हा संकल्प घेऊन आम्ही या निवडणूकीत उतरलो आहोत. आज तर आपण अटलजींना आदरांजली देतोच आहोत पण १६ जानेवारीला आपण अटलजींना खरी आदरांजली द्यायची आहे. "

याशिवाय मुंबई सरचिटणीस राजेश शिरवडकर यांनी, "जेव्हा मुंबईमध्ये आपल्या दोन खासदारांना विरोधीपक्षातले नेते हिणवत होते तेव्हा अटलजींनी संसदेत ठणकावून सांगितलेलं, आज तुम्ही आमच्यावर हसत आहात पण येणाऱ्या काळात संपूर्ण देश तुमच्यावर हसेल आणि आज काँग्रेसची जी अवस्था झालेली आहे ती सर्वजण पाहतच आहोत. येत्या निवडणुकीत मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि श्री. अमीत साटम यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे." अशा शब्दांत आपले विचार मांडले.

Comments
Add Comment