मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या राजकीय जाहिरातींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.आतापर्यंत साडेसात हजारांहूना अधिक बॅनर, पोस्टर, झेंडे आदींवर कारवाई करून ते हटवण्यात आले आहे. मुंबईतील खासगी जागांवरच सर्वांधिक ही बॅनरबाजी करण्यात आली होती. परंतु निवडणूक आचारसंहितेमुळे मुंबईला बकाल स्वरुप देणाऱ्या या पोस्टरबाजीवर कारवाई करण्यात आल्यामुळे मुंबई आता बॅनर आणि पोस्टरमुक्त झालेले पहायला मिळत आहे.
मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीकरता आचांरसहिता लागू झाल्यांनंतर मुंबईतील विविध राजकीय पक्ष आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात आलेले फलक, बॅनर, पोस्टर तसेच झेंडे हटवण्यास सुरुवात झाली आहे. १५ डिसेंबरला झालेल्या पहिल्या दिवशीच्या कारवाईमध्ये तब्बल १८१३ अनधिकृत बॅनर व फलकांसह झेंड्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर १६ डिसेंबर रोजी सर्वाधिक ३७५० जाहिरातींवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे प्रत्येक दिवशी ही कारवाई तीव्र करत अखेर २५ डिसेंबर २०२५ रोजी एकाही पोस्टर,बॅनर तसेच झेंड्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे परवाना विभागाच्या सातत्यपूर्ण कारवाईनंतर मुंबईत आजमितीस एकही राजकीय बॅनर, फलक आणि पोस्टर तसेच झेंडे नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
दिनांक १५ ते २५ डिसेंबर २०२५ पर्यंतची कारवाई
- भिंती रंगवणे : २७
- पोस्टर :९२५
- कटआऊट होर्डींग :६९८
- बॅनर : ४८७३
- झेंडे : ११२८
- एकूण : ७६५१






