नवी मुंबई : बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारपासून म्हणजेच २५ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृतपणे कार्यान्वित होणार आहे. यामुळे नवी मुंबई शहराची ओळख देशाच्या आणि विकसित राष्ट्रांच्या प्रवेशद्वारासारखी होणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि विविध समस्यांवर मात करून नवी मुंबई विमानतळाचे हे महत्त्वाकांशी प्रकल्प पूर्णत्वास आले आहे. बंगळूरुहून येणाऱ्या पहिल्या व्यावसायिक विमानाचे लँडिंग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर होणार आहे. पहिल्याच दिवशी ४ हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करणार असून, गोवा, कोची, दिल्ली आणि हैदराबाद या प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार आहे.
या विमानतळावर पहिल्या टप्प्यात दररोज ३० ‘फ्लाइट अप-डाऊन' होतील, असे सांगण्यात आले.
९ कोटी प्रवाशांसाठी विमानतळ सज्ज
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला २००७ मध्ये डीजीसीएकडून मान्यता मिळाली होती. त्यानंतर पर्यावरणीय अडथळे, जमीन संपादन, पुनर्वसन, कायदेशीर आणि तांत्रिक समस्यांचे मोठे आव्हान होते. पण या सर्व समस्यांवर मात करून विमानतळाचे काम पूर्ण झाले आहे. दीर्घकाळ चाललेल्या या प्रक्रियेनंतर विमानतळाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याने नवी मुंबईसह संपूर्ण राज्यासाठी हा ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. वार्षिक नऊ कोटी प्रवासी हाताळण्याची या विमानतळाची क्षमता आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. यामुळे मुंबई महानगर क्षेत्रात आता दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ उपलब्ध होणार असून, हवाई वाहतूक अधिक सुलभ आणि गतिमान होईल.
नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्याने उद्योग-व्यवसाय, आयटी, लॉजिस्टिक्स, पर्यटन आणि सेवा क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. विमानतळालगत मोठ्या प्रमाणात एरोसिटी (Aero City) विकसित होणार असून, त्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि नवी मुंबईचा आर्थिक चेहरा पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुरुवात ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून, विकासाचा नवा अध्याय आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या विमानसेवांमुळे नवी मुंबई देशाच्या नकाशावर अधिक ठळकपणे अधोरेखित होणार असून, ‘विकसित भारता'कडे नेणाऱ्या प्रवासात हा विमानतळ महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.






