Tuesday, December 23, 2025

युती, आघाड्यांसाठी जोरदार हालचाली

युती, आघाड्यांसाठी जोरदार हालचाली

भाजप-शिवसेनेत मुंबईसाठी तिसरी बैठक; उबाठा-मनसेचे आज ठरणार, काँग्रेस-वंचितच्या वाटाघाटी

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी सुरू झाली, तरी महत्त्वाच्या राजकीय पक्षांमधील युत्या आणि आघाड्यांचा गुंता अद्याप सुटलेला नाही. सर्वात प्रतिष्ठेच्या असलेल्या मुंबई पालिका निवडणुकीबाबत भाजप आणि शिवसेनेचे जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचले असले, तरी काही महत्त्वाच्या जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. दुसरीकडे, उबाठा आणि मनसेच्या चर्चा पूर्ण झाल्यामुळे बुधवारी दुपारी त्यांच्या युतीबाबत औपचारिक घोषणा होणार आहे. मुंबई वगळता अन्य ठिकाणी, महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याने काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचे संकेतही मिळत आहेत.

पुण्यात भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या अानुषंगाने भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू झाले आहे. सोमवारी संजोग वाघेरे पाटील यांच्यासह उषा वाघेरे या माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, मंगळवारी राहुल कलाटे यांच्या रूपाने मोठा मोहरा भाजपच्या गळाला लागला. त्यामुळे अजित पवारांसमोरील भाजपचे आव्हान तगडे झाले आहे. पुणे आणि पिंपरी पालिका अजित पवार आणि शरद पवारांच्या पक्षाने एकत्रित लढवाव्यात, याबाबत सोमवारी रात्री दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांमध्ये गुप्त खलबते झाली. त्यानंतर शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला. दरम्यान, पुण्याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवड संदर्भात अजित पवार निर्णय घेणार आहेत. इथल्या युतीबाबत बुधवारी भूमिका ठरेल, असेही तटकरे यांनी सांगितले.

मुंबईत स्थिती काय?

मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेची जागावाटपाच्या चर्चेची तिसरी फेरी मंगळवारी पार पडली. या बैठकीत जवळपास १८० जागांवर एकमत झाले असून, उर्वरित ४७ जागांबाबत येत्या दोन दिवसांत पुन्हा बैठक होणार आहे. दुसरीकडे, उबाठा आणि मनसेच्या युतीबाबत बुधवारी दुपारी १२ वाजता अधिकृत घोषणा होणार आहे. मनसेला सुमारे ७० जागा देऊन उबाठा गट स्वतः १०० जागा लढण्याच्या तयारीत आहे, तर उर्वरित जागा शरद पवार गटाला सोडण्याचे नियोजन असल्याचे समजते. मात्र, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात वाटाघाटी सुरू आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी ५०-५० च्या फॉर्म्युल्याचा आग्रह धरल्याने काँग्रेसने बोलणी अर्धवट सोडली. त्यात समाजवादी पार्टीने मुंबईत १५० जागा लढवण्याची घोषणा केल्याने काँग्रेस आणि उबाठा गटाची कोंडी झाली आहे. मुंबईतच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातही युतीबाबत चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी सांगितले की, भाजपबरोबर युतीबाबतची दुसरी फेरी येत्या एक-दोन दिवसांत होणार आहे. नवाब मलिक यांच्या नेतृत्वाला भाजपचा विरोध असला तरी चर्चा सुरू असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

ठाण्यात स्वबळाची चाचपणी

ठाणे महापालिकेत भाजप आणि शिवसेनेत जागावाटपावरून घमासान सुरू आहे. ही पालिका अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात राहिली आहे. मात्र, गेल्या निवडणुकीतील स्कोअर पाहता, भाजपला अधिक जागा हव्या आहेत. परिणीमी, दोन्ही पक्षांमध्ये सोमवारी होणारी तिसरी रद्द झाली. गेल्या आठवड्यात झालेल्या दुसऱ्या बैठकीत भाजपने शिवसेनेच्या महत्वाच्या जागांवर दावा केला होता. त्यामुळे तीन तास घासाघीस झाली. भाजपने किमान ५५ जागांचा आग्रह धरला असून, २२ डिसेंबर रोजी युतीची घोषणा होईल, यावर एकमत झाले होते. मात्र, शिवसेनेकडून प्रतिसाद न मिळाल्याने भाजपने १३१ प्रभागातील इच्छुकांच्या अर्जांची छाननी करून उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सुरू केली आहे.तर, कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

Comments
Add Comment