मुंबई : नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ वर मलकापूरजवळ भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. धुपेश्वरहून मलकापूरकडे येणारी कार रस्त्यालगत असलेल्या झाडावर जोरात आदळल्याने हा अपघात घडला.
धडक इतकी तीव्र होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात रुद्र उमेश पवार आणि विनायक जनार्दन अत्तरकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रशांत राजू वडारे, गणेश दीपक इंगळे आणि तक्ष धुरंधर हे तिघे गंभीर जखमी झाले होते. जखमींना तातडीने अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान गणेश दीपक इंगळे यांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा तिघांवर पोहोचला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहन हटवून पंचनामा करण्यात आला. प्राथमिक तपासात अतिवेग आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचं स्पष्ट झालं आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केलं. या भीषण अपघातामुळे मलकापूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.






