Monday, December 22, 2025

श्रीवर्धनमध्ये मंत्री अदिती तटकरे यांना पराभवाचा धक्का

श्रीवर्धनमध्ये मंत्री अदिती तटकरे यांना पराभवाचा धक्का

श्रीवर्धन : श्रीवर्धन नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत उबाठाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अतुल चौगुले यांनी २१९ मतांच्या फरकाने विजय मिळवत नगराध्यक्षपद पटकावले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जितेंद्र सातनाक यांना पराभव स्वीकारावा लागला. हा पराभव महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे यांच्यासाठी राजकीय धक्का मानला जात असून श्रीवर्धन नगर परिषदेची ही निवडणूक दोन मंत्र्यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून ओळखली जात होती. निवडणुकी दरम्यान मंत्री अदिती तटकरे या श्रीवर्धन शहरांमध्ये तळ ठोकून होत्या. मात्र, कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी अतुल चौगुले यांना मदत केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. याबाबत खुद्द विजयी उमेदवार अतुल चौगुले यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले. तसेच नगराध्यक्ष अतुल चौगुले यांनी राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच इतर सर्व राजकीय पक्षांचे सहकार्य मान्य करत आभार व्यक्त केले. विशेष बाब म्हणजे, विरोधक मानल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या कार्यकर्त्यांचेही त्यांनी जाहीरपणे आभार मानले. लोकशाही प्रक्रियेत मतदारांनी दाखवलेल्या परिपक्वतेमुळेच हा विजय शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १५ नगरसेवक,भारतीय जनता पार्टीचे २ नगरसेवक, शिवसेना शिंदे गटाचे ३ नगरसेवक निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टी यांची युती असूनही नगराध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाल्याने “गड आला पण सिंह गेला” अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. निवडणुकीत क्रॉस व्होटिंग मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले, अशी चर्चा मतमोजणी नंतर सुरू आहे. विजयानंतर अतुल चौगुले यांचे अभिनंदन करण्यासाठी कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांनी श्रीवर्धन येथे उपस्थिती लावली होती.

दरम्यान, या संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला डावलण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र वाकलेकर यांनी मतमोजणी पूर्ण झाल्या नंतरही कोणतीही अधिकृत माहिती पत्रकारांना दिली नाही. तसेच मतमोजणी कक्षाकडे जाण्यास पत्रकारांना मज्जाव करण्यात आला. याबाबत पोलीस अधिकारी खरात यांनी निवडणूक अधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे आदेश असल्याचे सांगत पत्रकारांना रोखले, या प्रकाराचा निषेध म्हणून पत्रकारांनी निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र वाकलेकर यांचा जाहीर निषेध नोंदवला तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेत बहिष्कार टाकण्याचा निर्णय पत्रकारांनी घेतल्याचे जाहीर केले असून लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता व माध्यमांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असताना, पत्रकारांवर घालण्यात आलेले निर्बंध चिंताजनक असल्याची भावना पत्रकार संघटनांनी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment