Monday, January 12, 2026

उड्डाणानंतर दिल्ली - मुंबई विमानात बिघाड, इंजिन हवेतच पडलं बंद

उड्डाणानंतर दिल्ली - मुंबई विमानात बिघाड, इंजिन हवेतच पडलं बंद

नवी दिल्ली : दिल्लीहून मुंबईकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात उड्डाणानंतर अवघ्या ४० मिनिटांत तांत्रिक बिघाड झाल्याने आपत्कालीन लँडिंग करावं लागलं. या विमानात ३५५ प्रवासी प्रवास करत होते. उजव्या बाजूचं इंजिन बंद पडल्याने वैमानिकाने तातडीने विमान पुन्हा दिल्ली विमानतळावर उतरवलं.

एअर इंडियाचं AI887 हे विमान आज सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झालं होतं. मात्र उड्डाणानंतर काही वेळातच विमानाच्या उजव्या इंजिनमधील ऑईल प्रेशर शून्यावर आल्याचं वैमानिकाच्या निदर्शनास आलं. ही बाब लक्षात येताच वैमानिकांनी हवेतच यू-टर्न घेतला आणि ६ वाजून ५२ मिनिटांनी विमान सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरवलं.

ऑईल प्रेशर कमी होणं ही विमानासाठी गंभीर तांत्रिक अडचण मानली जाते. या स्थितीत इंजिनच्या काही भागांपर्यंत तेल पोहोचत नाही, ज्यामुळे इंजिन गरम होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत उड्डाण सुरू ठेवल्यास इंजिन पूर्णपणे निकामी होण्याची शक्यता असते. मात्र विमानातील दुसरं इंजिन कार्यरत असल्यास वैमानिक सुरक्षित लँडिंग करू शकतात, म्हणूनच तत्काळ लँडिंगचा निर्णय घेण्यात आला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित असून त्यांना पुढील प्रवासासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली.

दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एअर इंडियाकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. तसेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment