सहकाराची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि संपूर्ण राज्याचे राजकीय लक्ष वेधून घेणाऱ्या ऐतिहासिक अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांनी सत्ता समीकरणे ढवळून काढली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा–शिवसेना–राष्ट्रवादी या महायुतीने जिल्ह्यातील बारा नगरपरिषदांपैकी नऊ नगरपालिकांवर सत्ता काबीज करत दमदार मुसंडी मारली असली, तरी संगमनेर व श्रीरामपूर या राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या नगरपालिकांमध्ये महायुतीला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रचाराच्या माध्यमातून महायुती एकसंध ठेवत अनेक ठिकाणी विजय मिळवला असला, तरी जिल्ह्याच्या केंद्रस्थानी असलेल्या श्रीरामपूर मध्ये काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले, तर राज्याच्या राजकारणात नेहमी चर्चेत असलेल्या संगमनेरमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपला बालेकिल्ला अबाधित ठेवला. दरम्यान, मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी श्रीरामपूर व संगमनेरमधील पराभव हा तात्पुरता असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत हा वचपा निश्चितपणे भरून काढू, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. पालकमंत्री विखे पाटील यांच्या होम ग्राऊंडवरील शिर्डी व राहाता या दोन्ही नगरपालिकांमध्ये महायुतीने निर्विवाद सत्ता राखत विरोधकांना धूळ चारली. राहाता नगरपालिकेत भाजपचे स्वाधीन गाडेकर बहुमताने विजयी झाले असून, २० पैकी १९ जागांवर भाजप–शिवसेना महायुतीचा विजय झाला आहे. विरोधकांच्या पदरात अवघी एकच जागा पडली. राहुरी मतदारसंघात माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी देवळाली प्रवरा नगरपरिषदेवर आपले वर्चस्व कायम राखले. तर काँग्रेसला चार जागा मिळाल्या.
माजी आ.शंकरराव गडाख यांचा गड जरी कायम राहिला, तरी नगराध्यक्षपद मात्र शिवसेनेकडे गेल्याने “गड आला, पण सिंह गेला” अशी स्थिती निर्माण झाली. तर एक जागा आम आदमी पार्टीने पटकावली. स्वर्गीय आ. शिवाजी कर्डीले यांच्या मतदारसंघातील राहुरी नगरपालिकेत माजी आ. प्राजक्त तनपूरे यांच्या शहर विकास आघाडीने निर्विवाद सत्ता मिळवली असून भाजपला फक्त सात जागांवर समाधान मानावे लागले. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांनी पुन्हा एकदा आपली राजकीय ताकद सिद्ध केली. संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मैथिली तांबे या तब्बल १६ हजार ४०० मतांनी विजयी झाल्या. शिवसेना–भाजप महायुतीच्या सुवर्णा खताळ यांचा पराभव झाला. ३० पैकी २७ जागांवर संगमनेर सेवा समितीने विजय मिळवत नगरपालिका पूर्णतः आपल्या ताब्यात घेतली. कोपरगाव नगरपालिका महायुतीतील अंतर्गत संघर्ष रंगला. राष्ट्रवादीचे काका कोयटे आणि भाजपचे पराग संधान यांच्यातील चुरशीच्या लढतीत नगराध्यक्षपदी भाजपचे पराग संधान विजयी झाले. जिल्ह्याच्या मध्यवर्ती श्रीरामपूर नगर परिषदवर मात्र काँग्रेसने झेंडा फडकावला. भाजपला येथे फक्त १० जागा, शिवसेनाला ३ जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ झाला. श्रीगोंदा नगरपालिकेत महायुतीने २२ जागांवर पूर्ण यश मिळवले. आ.मोनिका राजळे यांच्या मतदार संघातील शेवगाव नगरपालिकेत शिवसेनाचा नगराध्यक्ष विराजमान झाला, तर पाथर्डी नगरपालिकेवर भाजपने निर्विवाद सत्ता मिळवली. राज्यात चर्चेत असलेल्या रोहित पवार विरुद्ध प्रा. राम शिंदे या लढतीच्या पार्श्वभूमीवर जामखेड नगरपालिकेत भाजपने सत्ता काबीज केली. राष्ट्रवादीला येथे फक्त पाच जागा, तर वंचित आघाडीने दोन जागांवर खाते उघडले. एकूणच अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीने वर्चस्व प्रस्थापित केले असले, तरी संगमनेर व श्रीरामपूरमधील पराभव हे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टीने महायुतीसाठी इशारा मानले जात आहेत. आता या दोन तालुक्यांतील पराभवाचा वचपा काढून महायुती विरोधकांना व्हाईट वॉश देणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय लक्ष लागले आहे.






