कल्याण : कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्वेला जोडणारा वालधुनी उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामासाठी काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुलाच्या डांबरीकरणासह आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्यामुळे वाहनचालकांना पुढील काही दिवस वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार २० डिसेंबरच्या रात्रीपासून हा पूल पुढील २० दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार असून १० जानेवारी २०२६ पर्यंत वाहतूक बंद असणार आहे. यासंदर्भात वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
शाळांना नाताळच्या सुट्ट्या सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वाहतुकीवर कमी परिणाम व्हावा, या उद्देशाने या कालावधीत दुरुस्तीचे काम नियोजित करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या काळात नागरिकांनी नियोजित पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कालावधीत कल्याण पूर्वेकडून स्व. आनंद दिघे उड्डाणपुलावरून शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सम्राट चौकातून वालधुनी पुलाकडे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संबंधित वाहनांनी सम्राट चौकात उजवीकडे वळून शांतीनगर-उल्हासनगर मार्गे आपल्या इच्छित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उल्हासनगरकडून वालधुनी पुलाच्या माध्यमातून कल्याण पश्चिमेकडे येणाऱ्या वाहनांनाही सम्राट चौकात प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. ही वाहने डावीकडे वळवून स्व. आनंद दिघे उड्डाणपुलाच्या दिशेने वळवली जाणार आहेत.
तसेच कल्याण पश्चिमेकडून वालधुनी पुलावरून उल्हासनगर किंवा स्व. आनंद दिघे उड्डाणपुलामार्गे कल्याण पूर्वेकडे जाणाऱ्या वाहनांना सुभाष चौकात थांबवण्यात येणार आहे. ही वाहने पुढे कर्णिक रोडने जात प्रेम ऑटो परिसरात उजवे वळण घेऊन शहाड पुलामार्गे मार्गस्थ केली जाणार आहेत. नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.






