मुंबई : दृष्टिहीन महिलांच्या क्रिकेटमधील पहिला टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाने ऐतिहासिक विजय साजरा करताना, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संघातील खेळाडूंसोबत संवाद साधला आणि त्यांच्या यशाचे कौतुक केले.
कोलंबोत नुकत्याच पार पडलेल्या 'फर्स्ट वुमेन्स टी२० वर्ल्ड कप क्रिकेट फॉर द ब्लाइंड २०२५'च्या अंतिम सामन्यात भारताने नेपाळचा सात गडी राखून पराभव करत विश्वविजेतेपद पटकावले. हा दृष्टिहीन महिलांच्या क्रिकेटमधील पहिलाच टी-२० विश्वचषक होता आणि त्याचा मान भारताने मिळवला. या विश्वविजेतेपदापर्यंत पोहोचण्यासाठी संघातील सदस्यांनी अनेक आव्हानांवर मात केली आहे. संघातील अनेक खेळाडू लहान खेड्यांतील, शेतकरी कुटुंबातील किंवा छोट्या शहरांतील वसतिगृहांतील आहेत. त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.
महाराष्ट्राच्या गंगा कदम यांना या संघाचे उपकर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली. नऊ भावंडांच्या शेतकरी कुटुंबातील गंगा लहानपणापासून दृष्टिहीन आहे. भविष्याचा विचार करून तिच्या वडिलांनी तिला अंधांसाठीच्या विशेष शाळेत दाखल केले. तिथे सुरुवातीला गंमत म्हणून क्रिकेट खेळायला लागली. आवाजाच्या आधारावर चेंडूचा माग काढणे, वेळेचा अंदाज घेणे अशी अनेक आव्हाने होती. मात्र २६ वर्षीय गंगाने चिकाटीनं सराव करत हे कौशल्य आत्मसात केले. मुख्यमंत्र्यांनी तिचे विशेष कौतुक केले.






