मुंबई : अमेरिकेतील गाजलेल्या 'एपस्टिन प्रकरणा'चा आधार घेत भारतातील पंतप्रधान बदलले जातील, अशा आशयाचा अग्रलेख 'सामना'तून प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या कल्पनारंजनाचा समाचार घेताना भाजप नेते नवनाथ बन यांनी शिवसेना (उबाठा) आणि 'सामना'वर जोरदार टीका केली आहे. "अफवांवर सरकार पडत नाही, ते मतपेटीवर उभं राहतं. पंतप्रधान बदलण्याचं तुमचं स्वप्न म्हणजे गणपत वाण्याच्या माडीसारखं आहे," अशा शब्दांत त्यांनी सामनाला आरसा दाखवला आहे.
‘सामना’च्या आजच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा अफवा, कल्पनारंजन आणि राजकीय दिवास्वप्नांचा कळस गाठलेला दिसतो. अमेरिकेत घडलेल्या एपस्टिन प्रकरणाचा आधार घेऊन भारतातील पंतप्रधान बदलले जातील, राजकीय उलथापालथ होईल अशी भाकितं करणं म्हणजे गणपत वाण्याच्या माडी बांधण्याच्या स्वप्नासारखं आहे.…
— Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) December 19, 2025
लोकशाहीची थट्टा थांबवा!
पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा आधार घेत 'सामना'ने जे भाकीत केले आहे, ते केवळ हास्यास्पद असल्याचे नवनाथ बन यांनी म्हटले आहे. "लोकशाहीत सरकारं अफवांवर नाही, तर जनतेच्या कौलावर चालतात. २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये देशाच्या जनतेने नरेंद्र मोदींना स्पष्ट आणि ठाम कौल दिला आहे. परदेशातील कथित फायलींचा आधार घेऊन लोकशाहीची थट्टा करणे थांबवा," असा इशारा त्यांनी दिला.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागताच सत्ताधारी आणि विरोधकांमधील कलगीतुरा शिगेला पोहोचला आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि मंत्री ...
पत्रकारिता की भीतीकथा?
सामना अग्रलेखातील भाषेवर आक्षेप घेताना बन म्हणाले की, "अग्रलेखात 'भूत', 'भुताटकी', 'मानगुटी' असे शब्द वापरणे ही पत्रकारिता नसून भीतीकथा सांगण्याचा प्रयत्न आहे. झाडाचं पान पडलं तरी आभाळ कोसळलं म्हणून ओरडणाऱ्या भित्र्या सशासारखी तुमची अवस्था झाली आहे."
पराभवाच्या धक्क्यातून बाहेर पडा!
भारताची अर्थव्यवस्था आणि जागतिक प्रतिमा उंचावत असल्याने विरोधकांच्या पोटात दुखत असल्याची टीका बन यांनी केली. "निवडणुकीतील पराभव आणि नेतृत्वाचा अभाव झाकण्यासाठी तुम्ही परदेशी प्रकरणांचा आधार घेत आहात. पराभवामुळे तुम्हाला जो मानसिक धक्का बसला आहे, त्यातून लवकर बाहेर पडा आणि लवकर बरे व्हा," असा खोचक सल्लाही त्यांनी उबाठा गटाला दिला आहे.





