नवी दिल्ली : देशातील ग्रामीण जनतेला दोन दशके रोजगाराची हमी देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव आणि स्वरूप बदलणारे ‘व्हीबी-जी राम-जी’ विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. विरोधी पक्षांनी या विधेयकाला सभागृहात कडाडून विरोध केला. विरोधी खासदारांच्या गोंधळादरम्यान सरकारने हे विधेयक पारित केले आहे. यावेळी निषेध म्हणून विरोधकांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अंगावर कागद फेकले. गेल्या काही दिवसांपासून या विधेयकावरून वाद होत आहे.
नव्या रोजगार हमी योजनेतून ‘महात्मा गांधी’ हे नाव वगळण्यात आले असून या योजनेचे ‘विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड अजीविका मिशन’ (व्हीबी-जी-राम-जी) असं नामांतर करण्यात आले आहे. विरोधकांनी आरोप केला आहे की सरकार जाणीवपूर्वक महात्मा गांधींचे नाव हटवू पाहतेय. दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांनी याबाबत म्हटले आहे की विकसित भारताची आपली योजना डोळ्यासमोर ठेवून आम्ही योजनेत बदल करत आहोत.
बापू आमच्यासाठी आदर्श : शिवराज सिंह चौहान
शिवराज सिंह चौहान म्हणाले, विरोधी पक्ष बापूंच्या (महात्मा गांधी) विचारांचा खून करत आहे. काल सभागृहात मी मध्यरात्री दिड वाजेपर्यंत सर्व सदस्यांची मते ऐकली. मात्र, आता ते आमचे काही ऐकूनच घेत नाहीत. केवळ आपण बोलायचे, समोरच्या बाकावरील खासदारांचे काही ऐकूनच घ्यायचे नाही ही देखील एक प्रकारची हिंसा आहे. बापू आमच्यासाठी आदर्श आहेत. ते आम्हाला प्रेरणा देतात. आम्ही महात्मा गांधींच्या विचारांवर चालत आहोत. म्हणूनच भाजपने आपल्या पंचनिष्ठेमध्ये महात्मा गांधीजींच्या समाजिक, आर्थिक विचारांना सर्वप्रथम स्थान दिले आहे. केंद्रीय कृषीमंत्री म्हणाले, मनरेगाऐवजी केंद्र सरकारच्या व्हीबी-जी राम जी /ई योजनेचे प्रमुख उद्दीष्ट म्हणजे विकसित भारत २०४७ या पंतप्रधान मोदींच्या संकल्पाला हातभार लावणे. मोदींच्या राष्ट्रीय व्हिजनला अनुरूप असा ग्रामीण विकासाचा पाया रचणं हे या योजनेचं उद्दीष्ट आहे. मागील २० वर्षांमध्ये मनरेगाने ग्रामीण कुटुंबांना रोजगार दिला. परंतु, गावांमध्ये अलीकडच्या काळात अनेक सामाजिक व आर्थिक बदल झाले आहे. त्या आधारावर आता ही योजना अधिक व्यापक व मजबूत करणे आवश्यक आहे. आम्ही नेमके तेच करत आहोत.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडून नाराजी व्यक्त
दरम्यान, सभागृहात विरोधकांनी विधेयकाची प्रत फाडून भिरकावल्याबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आपण सभागृहात जनतेचे मुद्दे मांडायला हवेत. गदारोळ केल्याने आणि विधेयकाची प्रत फाडून फेकल्याने, प्रश्न सुटणार नाही, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना फटकारले. दरम्यान, विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत कागदाचे तुकडे भिरकावल्याने सभागृहाचे कामकाज शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.






