उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल
मुंबई : देशावर दहशतवादी हल्ले होत असताना, भारतीय लष्कर दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत असताना आणि संपूर्ण देश एकजुटीने उभा असताना काँग्रेसचे नेते मात्र पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कबर खोदण्याची भाषा करणाऱ्यांची कबर देशाची जनता खोदेल, असा थेट प्रहार शिंदे यांनी काँग्रेसवर केला.
राहुल गांधी, पृथ्वीराज चव्हाण आणि पी. चिदंबरम यांच्या भूमिकेवर टीका करताना शिंदे म्हणाले की, लष्कराच्या कारवाईवर प्रश्न विचारणे म्हणजे थेट जवानांचे मनोबल खच्चीकरण करणे आहे. पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन ‘सिंदूर’अंतर्गत दहशतवाद्यांचे तळ अचूकपणे उद्ध्वस्त करण्यात आले. ही कारवाई अत्यंत प्रिसाईज असून कोणतेही नागरी नुकसान झाले नाही. या कारवाईमुळे भारताची लष्करी ताकद आणि राजकीय इच्छाशक्ती जगासमोर पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली आहे, असे शिंदे म्हणाले.
या संपूर्ण मोहिमेत लष्करी जवानांच्या पाठीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी खंबीरपणे उभे राहिले. ‘खून आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही,’ हा संदेश मोदी सरकारने पाकिस्तानला आणि संपूर्ण जगाला दिला आहे. ही टीका देशप्रेमातून नाही, तर पाकिस्तान प्रेमातून होत आहे. काँग्रेस नेत्यांची विधाने पाकिस्तानमध्ये हेडलाईन बनत आहेत, हे अत्यंत लाजिरवाणे आहे. या शौर्यपूर्ण कारवाईनंतर काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आलेली वक्तव्ये देशविघातक असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.






