Thursday, December 18, 2025

Ashish Shelar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा बरी, विचारांवर नेहमीच खरी!' आशिष शेलारांची कवितेतून संजय राऊतांवर जहरी टीका

Ashish Shelar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा बरी, विचारांवर नेहमीच खरी!' आशिष शेलारांची कवितेतून संजय राऊतांवर जहरी टीका

राऊतांच्या पुनरागमनावर मंत्री शेलारांची उपरोधिक टोलेबाजी

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे राजकारण सध्या आरोप-प्रत्यारोपांनी तापलेले असतानाच, भाजपचे दिग्गज नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर 'काव्यप्रहार' केला आहे. संजय राऊत यांनी प्रकृतीच्या कारणास्तव काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या सकाळच्या पत्रकार परिषदा सुरू केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शेलारांनी ट्विटरच्या (X) माध्यमातून एक उपरोधिक कविता शेअर करत राऊतांच्या कार्यशैलीवर आणि त्यांच्या भाषेवर जोरदार टीका केली आहे. "सकाळचा भोंगा पुन्हा सुरू झाला" आशिष शेलार यांनी आपल्या कवितेत संजय राऊत यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदांचा उल्लेख 'सकाळचा भोंगा' असा केला आहे. राऊत यांनी "मी तीन महिन्यांनी परत येईन" असे म्हटले होते, मात्र ते एका महिन्याच्या आतच परतल्याचा टोला शेलारांनी लगावला. "विश्वविख्यात प्रवक्त्यांना ठणठणीत पाहून बरे वाटले, पण आता महाराष्ट्राचा सकाळी सकाळी चॅनेल बदलण्याचा हंगाम परत आला आहे," असे म्हणत त्यांनी राऊतांच्या भाषणांतील कंटाळवाणेपणावर बोट ठेवले. हास्यजत्रेची तुलना आणि 'उखाड दिया'चा उल्लेख शेलार यांनी आपल्या कवितेत लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' याचा संदर्भ दिला आहे. ते म्हणतात, "यांना ऐकण्यापेक्षा महाराष्ट्राची हास्यजत्रा बरी, विनोदी असली तरी ती विचारांवर नेहमीच खरी!" संजय राऊत यांच्या आक्रमक भाषेवर टीका करताना शेलार पुढे म्हणतात की, हे प्रवक्ते खूप बोलतात, कोणाचेही नाव घेतात आणि 'उखाड दिया'ची गर्जना करतात. मात्र, अशा गर्जना करून ते स्वतःच्याच पक्षाला उखडून टाकत असल्याचा दावा शेलारांनी केला आहे. २९ महापालिकांतील पराभवाचे भाकीत कवितेच्या शेवटी शेलारांनी राजकीय इशाराही दिला आहे. संजय राऊत हे त्यांच्या पक्षाचे 'हुकमाचे एक्के' असल्याचे म्हटले जाते, पण हे 'विश्वविख्यात' प्रवक्ते जितके जास्त बोलतील, तितका त्यांच्या पक्षाचा आगामी २९ महापालिकांमध्ये पराभव पक्का आहे, असा घणाघात शेलारांनी केला आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आशिष शेलार यांची ही कविता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून भाजप समर्थकांकडून तिला दाद मिळत आहे. तर दुसरीकडे, ठाकरे गटाकडून या टीकेला काय उत्तर मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेलार आणि राऊत यांच्यातील हा 'ट्विटर वॉर' आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >