काँग्रेसची टीका देश प्रेमातून नाही पाकिस्तान प्रेमातून
पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जोरदार प्रहार
मुंबई : देशावर दहशतवादी हल्ले होत असताना, भारतीय लष्कर दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत असताना आणि संपूर्ण देश एकजुटीने उभा असताना काँग्रेसचे नेते मात्र पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कबर खोदण्याची भाषा करणाऱ्यांची कबर देशाची जनता खोदेल,” असा थेट, प्रहार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर केला.
राहुल गांधी, पृथ्वीराज चव्हाण आणि पी. चिदंबरम यांच्या भूमिकेवर टीका करताना शिंदे म्हणाले की, लष्कराच्या कारवाईवर प्रश्न विचारणे म्हणजे थेट जवानांचे मनोबल खच्चीकरण करणे आहे असे शिंदे म्हणाले.
पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन ‘सिंदूर’ अंतर्गत दहशतवाद्यांचे तळ अचूकपणे उद्ध्वस्त करण्यात आले. ही कारवाई अत्यंत प्रिसाईज असून कोणतेही नागरी नुकसान झाले नाही. या कारवाईमुळे भारताची लष्करी ताकद आणि राजकीय इच्छाशक्ती जगासमोर पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली आहे, असे शिंदे म्हणाले.
या संपूर्ण मोहिमेत लष्करी जवानांच्या पाठीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी खंबीरपणे उभे राहिले. “खून आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही,” हा संदेश मोदी सरकारने पाकिस्तानला आणि संपूर्ण जगाला दिला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, या शौर्यपूर्ण कारवाईनंतर काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आलेली वक्तव्ये देशविघातक असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. “ही टीका देशप्रेमातून नाही, तर पाकिस्तानप्रेमातून होत आहे. काँग्रेस नेत्यांची विधाने पाकिस्तानमध्ये हेडलाईन बनत आहेत, हे अत्यंत लाजिरवाणे आहे,” असे ते म्हणाले.
“२६/११ च्या वेळी काँग्रेस सरकारने जर सडेतोड उत्तर दिले असते, तर आज देशाला पुन्हा पुन्हा अशी किंमत मोजावी लागली नसती,” असा टोला त्यांनी लगावला.
“अब गोली का जवाब गोली से,” असे सांगत शिंदे यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानविरोधातील ही कारवाई संपूर्ण देशाच्या आत्मसन्मानाशी जोडलेली आहे. देश, लष्कर आणि पंतप्रधानांविरोधात गरळ ओकणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
शेवटी, पहलगाममध्ये निष्पाप नागरिकांच्या हत्येचे जशास तसे उत्तर भारतीय लष्कराने दिल्याचे सांगत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लष्कराला सलामी दिली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे अभिनंदन केले.






