मायभाषा : डॉ. वीणा सानेकर
एका कार्यक्रमात खूप दिवसांनी डॉ. प्रकाश परब यांना ऐकण्याचा योग आला. मराठी साहित्य आणि भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रकाश परब सर हे नाव माहीत नाही असे होणे शक्य नाही. व्याकरणाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रकाश परब यांचे पुस्तक कायम मार्गदर्शक ठरले. चर्चासत्र आणि परिसंवादातून सर कायम ठाम भूमिका मांडत आले आहेत. भाषा नियोजन हा सरांचा खास भाषाविषयक अभ्यासाचा विषय. साहित्याचा अभ्यास म्हणजे भाषेचा अभ्यास नव्हे, हा विचार मांडणाऱ्या सरांनी चौकटीबद्ध अभ्यासक्रमांच्या पलीकडे जाऊन मराठीशी निगडीत वेगवेगळे अभ्यासक्रम तयार करण्याची गरज वेगवेगळ्या महाविद्यालयांत जाऊन आवर्जून मांडली. मराठीच्या अभ्यासक्रमांना व्यवसायांच्या संधींशी जोडणे गरजेचे आहे हे गेली अनेक वर्ष सर आपल्या भाषणांतून आणि लेखनातून स्पष्ट करीत आहेत.
सर स्वतः निवृत्तीपर्यंत मुंबईतील वझे महाविद्यालयात मराठीचे विभागप्रमुख होते. मराठी विभागांना लागलेली उतरती कळा हा त्यांच्या चिंतेचा विषय होताच, पण मराठीच्या विद्यार्थ्यांना आपण अर्थार्जनाच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देऊ शकलो नाही, तर आपण त्यांचे अपराधी ठरू अशी त्यांची रास्त धारणा राहिली आहे.
मुलुंड येथील एका कार्यक्रमात ते बोलत असताना सरांनी जे विचार व्यक्त केले ते अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणून त्यातले काही मुद्दे समोर ठेवते आहे. “आपल्या भाषेची चिंता करणाऱ्या व्यक्तीची आपल्या समाजात टवाळकी केली जाते. कारण चंद्र, सूर्य आहेत तोवर आपल्या भाषेला काहीही होणार नाही, अशी भाकिते करण्यात लोक मग्न राहिले.
ज्या ज्या देशांनी आपल्या भाषेची शक्ती ओळखून मातृभाषेवर आधारित शिक्षण दिले त्यांची प्रगती अधोरेखित करण्याजोगी आहे. आर्थिक यश हेच जीवनाच्या केंद्रस्थानी आले. समाज ज्ञानार्थी असण्यापेक्षा पोटार्थी अधिक झाला. भाषिक जाणीव असलेला समाज तर आता जवळपास उरला नाही.
मातृभाषेत शिक्षण घेणे थांबवून आज आपण दुय्यम दर्जाच्या निर्मितीवर समाधान मानत आलो. आज दिसणाऱ्या सांस्कृतिक भणंगीकरणाची चिकित्सा करणे गरजेचे आहे. स्थानिक भाषा शिकण्याची फळे आज जगभरातील लोक चाखत आहेत पण आपण मात्र ‘इंग्रजी ही एकच भाषा शिका. कारण तीच जगाची भाषा आहे ’ या प्रचाराला बळी पडत आहोत.
परब सर वर्षानुवर्षे तळमळीने बोलत नि लिहीत आहेत. इतकेच नाहीत तर मराठीच्या लढाईत सरांचे स्थान मोठे आहे. आपण नुसत्या बनावटी श्रीमंतीला भुलून सांस्कृतिक अधःपात ओढवून घेत आहोत, ही जाणीव करून देणारा ‘जागल्या’ ही परब सरांची ओळख आहे.