Tuesday, December 16, 2025

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेत महायुतीतील कोणता पक्ष किती जागा लढवणार ?

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेत महायुतीतील कोणता पक्ष किती जागा लढवणार ?

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करुन महाराष्ट्रातील मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान आणि १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर होतील. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी प्रमुख राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. प्रत्येक पक्ष जास्तीत जागा लढवण्याचे नियोजन करत आहे.

कोविड संकट, आरक्षणाचा पेच यामुळे पाच टर्म संपल्यानंतर बराच काळ मुंबई महापालिकेवर प्रशासक आहे. लोकप्रतिनिधीच नाहीत. शिवाय मागील काही वर्षांमध्ये मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकारणात भरपूर उलथापालथ झाली आहे. या बदललेल्या परिस्थितीत भाजप मुंबई महापालिकेत स्वतःची बाजू भक्कम करण्यास उत्सुक आहे.

मुंबई महापालिकेसाठी शेवटची निवडणूक २०१७ मध्ये झाली. या निवडणुकीत २२७ पैकी शिवसेनेने ८४ आणि भाजपने ८२ जागा जिंकल्या होत्या. भाजपने पाच वर्ष महापौर किंवा उपमहापौर पद घ्यायचे नाही पण मुंबईकरांचे विश्वस्त असल्याप्रमाणे काम करायचे आणि शिवसेनेला महापौर आणि उपमहापौर पदासाठी पाठिंबा द्यायचा अशी भूमिका घेतली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेने पहिल्यांदाच मुंबईत महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही पदं काबीज केली. नंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. मुंबई मनपाचा कार्यकाळ संपला आणि कोविड संकट, आरक्षणाचा पेच यामुळे मुंबईत महापालिकेसाठी निवडणूक झाली नाही. मुंबईचा कारभार प्रशासकाकडे गेला. आता काही वर्षांच्या अंतरानंतर पुन्हा एकदा मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. मध्यंतरीच्या काळात शिवसेनेची ताकद विभागली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिउबाठा आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेना अशी स्थिती निर्माण झाली. आता शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेना, रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्थात रिपाईं आठवले गट आणि भाजप यांनी युती केली आहे. ही महायुती मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार हे निश्चित आहे. महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी १५० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवून महायुती नियोजन करत आहे. पण महायुतीतील कोणता घटक पक्ष किती जागा लढवणार यावरुन तर्कवितर्क सुरू आहेत.

एकनाथ शिंदेंची स्वतःची ताकद प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यात आहे. मुंबईत उद्धव ठाकरे कमकुवत झाले आहेत पण राजकीयदृष्ट्या शिंदेंच्या ऐवजी भाजपची ताकद वाढली आहे, असे मत अनेक राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत. मोदी - फडणवीस प्रभावामुळे मुंबईतल्या सर्व समाजांमध्ये भाजपकडे ओढा असलेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या परिस्थितीत मुंबईच्या विकासाकरिता केंद्रात, राज्यात आणि मुंबईत भाजप असणे फायद्याचे असा विचार करणाऱ्या मतदारांमध्ये वाढ होत आहे. यामुळे भाजप २०१७ च्या तुलनेत जास्त जागा लढवण्यास उत्सुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महायुतीचे जागा वाटपाचे सूत्र ठरवण्यासाठी मंगळवारी १६ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईत नेत्यांची बैठक झाली. बैठकीच्या आणखी काही फेऱ्या होण्याची आणि आठवड्याभरात चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २३ ते ३० डिसेंबर एवढी मुदत आहे. यामुळे महायुतीचे नेते आठवड्याभरात जागा वाटपाचे सूत्र ठरवतील अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment