Tuesday, December 16, 2025

विधानसभेत पुन्हा एकदा घुमला आमदार निलेश राणे यांचा आवाज

विधानसभेत पुन्हा एकदा घुमला आमदार निलेश राणे यांचा आवाज

कोकणातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर वेधले सरकारचे लक्ष

मुंबई : नागपूर येथे नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आपल्या अभ्यासपूर्ण व मुद्देसूद भाषणांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर सभागृह व सरकाराचे लक्ष वेधत कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा विधानसभेत आपली आगळीवेगळी अशी छाप पाडली. कोकणात अतिवृष्टीमुळे शेतकरी व मच्छीमार बांधवांचे झालेले नुकसान, रस्त्यांची दुरवस्था, रखडलेले सिंचन प्रकल्प, वाळू व्यावसायिकांची प्रशासनाकडून होणारी ससेहोलपट यांसह अन्य प्रश्नांवर सभागृहात आवाज उठवत जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी त्यांनी सरकारकडे केली. त्यांच्या या भाषणाचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी देखील सर्वसामान्यांचा बुलंद आवाज अशा प्रतिक्रिया देत आमदार राणे यांचे कौतुक करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

विधान भवानातील दमदार एंट्री, मिडियाचा पडणारा गराडा आणि त्या मिडियासमोर आपला मुद्दा तेवढ्याच प्रभावीपणे मांडत रोखठोक बोलणारे आ. निलेश राणे यांनी संपूर्ण अधिवेशनात आपली छाप पाडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील रणधुमाळीनंतर सुरू झालेल्या या अधिवेशानात आ. राणे हे मिडियाच्या केंद्रस्थानी राहिले.

कुडाळ-मालवणचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्याच झालेल्या नागपूर अधिवेशनात आ. राणे यांनी आपल्या कार्यपद्धतीची झलक दाखविली होती. त्यानंतर मुंबईत झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांसह अन्य विषयांवर चर्चेत सहभागी होत त्यांनी केवळ आपल्या मतदारसंघातील नाही तर संपूर्ण कोकणातील जनतेचे प्रश्न मांडून सभागृहाचे व सरकाराचे लक्ष वेधले होते.

नागपूर येथे ८ ते १४ डिसेंबर या सात दिवसांच्या कमी कालावधीत झालेल्या अधिवेशनातही आ. राणे यांनी आपली छाप पाडली. या अधिवेशनात सातही दिवस हजेरी लावत त्यांनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली. औचित्याचा मुद्दा, अतिवृष्टीवरील २९३ चा प्रस्ताव, लक्षवेधी, पुरवणी मागण्यांवरील चर्चा, प्रश्नोत्तरे, पॉइंट ऑफ इन्फरमेशन अशा विधिमंडळातील लोकप्रतिनिधींना असलेल्या विविध आयुधांचा वापर करत आ. राणे यांनी अनेक प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडली. सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी असूनही कोणतीही तमा न बाळगता त्यांनी सामान्य जनतेचे प्रश्न विधानसभेत लावून धरल्याने त्यांची हीच कृती अनेकांना भावली आहे. एक आक्रमक पण तेवढेच संवेदनशील नेतृत्व अशी आ. राणे यांची ओळख आहे. त्यामुळे या अधिवेशनातही आ. निलेश राणे यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना फोडलेली वाचा अनेकांना भावली आहे. आ. राणे यांनी सभागृहात जलसिंचन प्रकल्पांबाबत उपस्थित केलेल्या या मुद्यांना चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनीही आपल्या भाषणात दुजोरा देत रत्नागिरीतही हीच अवस्था असल्याचे सांगितले. आपल्या अभ्यासपूर्ण व मुद्देसूद भाषणांनी पुन्हा एकदा आ. राणे यांनी सभागृहात आपली छाप पाडली. यावेळी सभागृहातील अनेक ज्येष्ठ व प्रथमच निवडून आलेल्या अनेक आमदारांनी आ. राणे यांचे कौतुकही केले. जनतेच्या प्रश्नासाठी सभागृहात जास्तीत जास्त वेळ उपस्थित राहून आ. राणे यांनी जनतेच्या प्रश्न व समस्यांप्रती किती संवेदनशीलता आहे हेच दाखवून दिले आहे. तर सभागृहाबाहेरही आ. निलेश राणे चर्चेत राहिले. विधिमंडळात येताना व सभागृहातून बाहेर पडताना मिडियाचा पडणारा गराडा, विचारले जाणारे अनेक प्रश्न व त्यांचे आ. राणे यांच्याकडून दिले जाणारे सडेतोड उत्तर यामुळे ते मिडियामध्येही चांगलेच चर्चेत राहिले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >