मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही ऐतिहासिक खेळी करुनही वैभवला आणखी काही महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता येणार नाही.
भारताने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत ५० षटकांत सहा बाद ४३३ धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या यूएईने ५० षटकांत सात बाद १९९ धावा केल्या होत्या. भारताने हा सामना २३४ धावांनी जिंकला. या सामन्यात वैभवच्या वादळी खेळीमुळे भारताचा विजयाचा मार्ग सोपा झाला. पण एवढा वादळी खेळ करुनही वैभवला आणखी काही महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता येणार नाही.
आयसीसीच्या नियमानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूने १५ वर्षे वयाची अट पूर्ण करणे आवश्यक आहे. वैभव सूर्यवंशीचा जन्म २७ मार्च २०११ रोजी झाला आहे. वैभवला वयाची अट पूर्ण करण्यासाठी आणखी किमान १०१ दिवस थांबावे लागणार आहे. या एका नियमामुळे वैभव सूर्यवंशी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकत नाही.
वैभव हा एक उदयोन्मुख क्रिकेटपटू आहे. वय त्याच्या बाजूने आहे. थोडा संयम बाळगला आणि खेळात सातत्य ठेवले, आत्मविश्वासाने क्रिकेट खेळत राहिला तर वैभव लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकेल, असे मत क्रिकेट तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.






