Sunday, December 14, 2025

बजरंग दलाबाबत विजय वडेट्टीवारांची मुक्ताफळे; भाजप-शिवसेनेचे आमदार आक्रमक

बजरंग दलाबाबत विजय वडेट्टीवारांची मुक्ताफळे; भाजप-शिवसेनेचे आमदार आक्रमक

नागपूर : "राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे शेतकर्‍यांकडील भाकड जनावरांची संख्या वाढली आहे. शेतकरी अशी जनावरे विकू शकत नाही. राज्यात गोरक्षकाच्या नावाखाली बजरंग दलासारख्या संघटनेच्या टोळ्या सिद्ध झाल्या आहेत. ते शेतकर्‍यांकडून पैसे वसूल करत आहेत", असा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी विधानसभेत प्रश्नोत्तरात केला. त्याला भाजप-शिवसेनेच्या आमदारांनी हरकत घेऊन आक्रमकपणे विरोध केला.

बजरंग दलाचा यामध्ये कोणताही सहभाग नसल्याने या संघटनेचे नाव घेतल्याविषयी विजय वडेट्टीवार यांनी क्षमा मागावी, अशी जोरदार मागणी भाजप-शिवसेनेच्या आमदारांनी केली. या वेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बजरंग दल संघटनेचे नाव कामकाजातून काढून टाकले आहे, असे सांगितले. भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा तारांकित प्रश्न मांडला होता.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, जेव्हा शेतकरी जनावरांची वाहतूक करतात, तेव्हा त्यांना थांबवले जाते, धमकी दिली जाते. ऐकले नाही, तर मारहाण केली जाते. एका १७ वर्षाच्या शेतकर्‍याला इतकी मारहाण केली की, त्याने आत्महत्या केली. भाकड जनावर विकून शेतकर्‍यांना काही पैसे तरी मिळतात; पण आता या बनावट टोळ्या शेतकर्‍यांच्या गाड्या थांबवून त्यांच्याकडून पैसे वसुली करतात. याविरोधात सरकारने कारवाई केली पाहिजे. ही वसुली थांबवली पाहिजे.

मिळते ५० रुपये पशु अनुदान - पंकजा मुंडे

याला उत्तर देतांना पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोवंशाची ने-आण करणारी वाहने अडवल्यास तक्रार केल्यानंतर पोलिसांकडून कारवाई केली जाते. कुणाला पाठीशी घालण्यात येणार नाही. अहिल्यानगर येथे बनावट गोरक्षक बनवून लुटमार करणार्‍या व्यक्तीविद्ध २ पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत; मात्र जप्त केलेले पशुधन परत आणण्यास गेलेल्या एका लोकप्रतिनिधीवर हल्ला करण्यात आल्याचे निदर्शनास आलेले नाही. शेतकर्‍यांकडील भाकड गायी संगोपनासाठी गोशाळेत ठेवण्यात येतात. या देशी गायींना प्रतिदिन ५० रुपये पशु अनुदान दिले जाते. भाकड जनावर प्रकरणी ज्या टोळ्या गैरलाभ घेतात त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. याविषयी शेतकरी संघटनेकडून तक्रारीही आल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उत्तराला आमदार संजय कुटे याची हरकत

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यात १ कोटी शेतकरी आहेत. एका शेतकर्‍याकडे १० भाकड जनावरे असतील, तर प्रत्येकी ५० रुपये प्रमाणे प्रतिदिन ५०० रुपये गायींसाठी द्यावे लागतील. असे पैसे देण्यासाठी राज्याची तिजोरी ओसंडून वहात नाही. गोशाळा असतील, तर त्याचे रेकॉर्ड ठेवता येते. चुकीचे केले, तर त्याचे लेखापरीक्षण करता येईल. बनावट गोरक्षक लुटमार करत असतील, तर त्यावर बंधने आणली पाहिजे. अजित पवार यांच्या विधानाला हरकत घेतांना भाजपचे आमदार संजय कुटे म्हणाले की, शेतकरी गायींची पूजा करतो, त्यामुळे वाहनांतून गायींची वाहतूक करतांना शेतकरी गायींना त्रास होईल, असे अजिबात वागत नाही. शेतकरी इतरांप्रमाणे वाहनात गायींची कोंबून त्यांची वाहतूक करत नाहीत. गायींची कत्तल करणारे हे शेतकर्‍यांच्या नावे पावती फाडतात, हे खपवून घेतले जाणार नाही. प्रतिदिन १० गायी, भाकड जनावरांसाठी ५० रुपये देण्यास काहीच हरकत नाही. यासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांचे प्रावधान करू शकतो, तसेच देशी गायींचा संवेदनशीलपणे आणि शेतकर्‍यांच्या भावनेचा विचार करून राज्यात गोशाळांची संख्या वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >