Sunday, December 14, 2025

धरमशाला टी ट्वेंटी सामन्यात भारताचा विजय, मालिकेत घेतली आघाडी

धरमशाला टी ट्वेंटी सामन्यात भारताचा विजय, मालिकेत घेतली आघाडी

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला येथे झालेला सामना भारताने सात विकेट राखून जिंकला. या सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव ११७ धावांत गुंडाळला. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने १५.५ षटकांत तीन बाद १२० धावा केल्या आणि सामना जिंकला.  या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर रीझा हेंड्रिक्स (शून्य धावा) आणि एडन मर्कराम (६१ धावा) या दोघांना बाद करणारा अर्शदीप सिंग सामनावीर झाला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत सर्वबाद ११७ धावा केल्या. क्विंटन डी कॉकने एक, रीझा हेंड्रिक्सने शून्य, एडन मर्करामने ६१, डेवॉल्ड ब्रेव्हिसने दोन, ट्रिस्टन स्टब्सने नऊ, कॉर्बिन बॉशने चार, डोनोव्हन फरेराने २०, मार्को जॅनसेनने दोन, अँरिक नॉर्टजेने १२, लुंगी न्गिडीने नाबाद दोन, ओटनील बार्टमनने एक धावांचे योगदान दिले. भारताकडून वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा या चौघांनी प्रत्येकी दोन तर शिवम दुबे आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली. यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या भारताकडून अभिषेक शर्माने ३५, शुभमन गिलने २८, तिलक वर्माने नाबाद २५, सूर्यकुमार यादवने १२, शिवम दुबेने नाबाद १० धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेकडून कॉर्बिन बॉश, लुंगी न्गिडी आणि मार्को जॅनसेनने प्रत्येकी एक विकेट घेतली.

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कटकचा टी ट्वेंटी सामना १०१ धावांनी आणि धरमशाला येथील टी ट्वेंटी सामना सात विकेट राखून जिंकला. दक्षिण आफ्रिकेने चंदिगड येथील टी ट्वेंटी सामना ५१ धावांनी जिंकला. आता लखनऊ आणि अहमदाबाद येथे प्रत्येकी एक टी ट्वेंटी सामना होणार आहे. या दोन सामन्यांत काय होते याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.

चौथा टी ट्वेंटी सामना - लखनऊ - १७ डिसेंबर २०२५

पाचवा टी ट्वेंटी सामना - अहमदाबाद - १९ डिसेंबर २०२५

हार्दिक पांड्याची ऐतिहासिक कामगिरी

हार्दिक पांड्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात खेळताना ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये १०० विकेट घेतल्या. टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एक हजार धावा आणि १०० विकेट अशा दोन्ही कामगिरी करणारा जगातील पहिला गोलंदाज आणि अष्टपैलू क्रिकेटपटू होण्याचा मान हार्दिक पांड्याने पटकावला. ट्रिस्टन स्टब्सची विकेट घेत हार्दिकने १०० विकेट टप्पा गाठला. याआधी अर्शदीप आणि जसप्रीत बुमराह यांनी टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये विकेटचे शतक साजरे केले आहे.

टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज

अर्शदीप सिंग १०८ विकेट

जसप्रीत बुमराह १०१ विकेट

हार्दिक पांड्या १०० विकेट

Comments
Add Comment