४ गुंठ्याचे ४० गुंठे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा
नागपूर : बाडापोरखण ता. डहाणू (जि. पालघर) येथील जमिनीच्या ४ गुंठ्याचे परस्पर ४० गुंठे करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित तलाठी आणि मंडल अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.
संतोष कोटनाके तलाठी तर मंडल अधिकाऱ्याचे नाव ज्योत्सना जमजाळ मंडल अधिकारी आहेत. तसेच, निवृत्त झाल्यानंतरही कंत्राटी पद्धतीने त्याच कार्यालयात काम करणाऱ्या आणि गैरव्यवहारांना खतपाणी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती घेऊन त्यांना तात्काळ हटवण्यात येईल, असे आश्वासनही महसूलमंत्र्यांनी सभागृहात दिले.
शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी झालेल्या चर्चेत आमदार भास्कर जाधव आणि योगेश सागर यांनी लक्षवेधीवरील चर्चेत सहभाग घेतला.
नेमका घोटाळा काय?
डहाणू परिसरात जमिनीचे भाव गगनाला भिडले असताना, जानकीबाई (१९८६ चा फेरफार) यांच्या जमिनीच्या नोंदीमध्ये फेरफार करून राजेंद्र राऊत यांनी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याशी संगनमत केले. यातून ४ गुंठे जमिनीचे क्षेत्र ४० गुंठे दाखवण्यात आले. इतकेच नव्हे, तर या जागेवर बोगस झाडे लागवडही दाखवण्यात आली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत तलाठी संतोष कोटणाके आणि मंडल अधिकारी ज्योत्सना जमजाळ हिला निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांवर आणि लाभार्थींवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
'प्रशासन उशिरा जागे झाले'
आ. भास्कर जाधव यावेळी म्हणाले, "विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यासाठी ३० दिवस आधी सूचना द्यावी लागते. सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर जिल्हाधिकारी आणि प्रशासन जागे झाले आणि त्यांनी नोटीस बजावली. ४ गुंठ्याचे ४० गुंठे करण्याचे धाडस केवळ तलाठी करू शकत नाही, त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही अभय असते," असा आरोप जाधव यांनी केला. यावर उत्तर देताना मंत्र्यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन प्रांत किंवा तहसीलदार यांचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याचे संकेत दिले.
निवृत्त अधिकाऱ्यांच्या 'टोळी'ला चाप
आ. योगेश सागर यांनी एका गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधले. अनेक ठिकाणी निवृत्त झालेले तलाठी, सर्कल आणि इतर अधिकारी यांना कंत्राटी पद्धतीने त्याच कार्यालयात पुन्हा कामावर घेतले जाते. हे अधिकारी माहितीचा गैरवापर करून जमिनींचे वाद आणि घोटाळे निर्माण करतात. यावर महसूलमंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, "पालघर, ठाणे, रायगड, नवी मुंबई, नाशिक, पुणे, संभाजीनगर आणि नागपूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये आणि लगतच्या भागात निवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा त्याच ठिकाणी नेमले असेल, तर त्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ कामावरून कमी करण्यात येईल," अशी घोषणा केली.






