मुंबई : राज्यात विशेषतः मुंबईत मुली आणि लहान मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. गेल्या दहा महिन्यांत राज्यात मुलींच्या अपहरणाचे तब्बल १,१८७ गुन्हे दाखल झाले असून दररोज सरासरी चार ते पाच मुली बेपत्ता होत असल्याची गंभीर बाब त्यांनी अधोरेखित केली आहे.
राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे की, एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार २०२१ ते २०२४ या कालावधीत लहान मुलांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये जवळपास ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. लहान मुलांना पळवून त्यांना कामाला जुंपणे, भीक मागायला लावणे यासाठी आंतरराज्य टोळ्या कार्यरत असल्याचा आरोप करत, या टोळ्या इतक्या बिनधास्तपणे कशा काम करतात, असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.
प्रति, श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, सस्नेह जय महाराष्ट्र, एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं…
— Raj Thackeray (@RajThackeray) December 13, 2025
फक्त किती गुन्हे दाखल झाले आणि किती मुलं सापडली, एवढी आकडेवारी देऊन सरकारने जबाबदारी झटकू नये, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. अनेक पालक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायलाच पोहोचत नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मुलांची सुटका झाली तरी त्या काळात त्यांच्या मनावर होणाऱ्या मानसिक आघाताचं काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
रस्त्यावर, स्टेशनवर आणि बसस्थानकांवर भीक मागणारी लहान मुलं नेमकी कोणाची आहेत, त्यांच्यासोबत असलेली व्यक्ती खरंच पालक आहे का, याची चौकशी करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. गरज भासल्यास डीएनए चाचणीचे आदेश देण्याची तयारी सरकारने दाखवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.राज्यात लहान मुलं, तरुण मुली आणि जमिनी पळवल्या जात असताना या गंभीर विषयांवर विधिमंडळात चर्चा का होत नाही? असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांनाही लक्ष्य केले आहे. हिवाळी अधिवेशन केवळ पुरवणी मागण्या मंजूर करण्यापुरतेच मर्यादित राहते का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
अधिवेशनात अनेकदा मंत्री उपस्थित नसतात, त्यामुळे अशा गंभीर विषयांवर चर्चा होईल अशी अपेक्षा करणंही अवघड झाल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्र सरकारनेही सर्व राज्यांशी चर्चा करून या विषयावर कृतिगट तयार करायला हवा, मात्र मातांच्या वेदना ऐकण्याऐवजी इतर मुद्द्यांवरच चर्चा होत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी या विषयात वैयक्तिक लक्ष घालून केवळ चर्चा न करता ठोस कृती करावी, हीच महाराष्ट्राची अपेक्षा असल्याचे राज ठाकरे यांनी पत्राच्या शेवटी नमूद केले आहे.






