बिबट्याच्या हल्ल्यात दोन जण जखमी
नांदगाव मुरुड : नागावमधून वनखात्याच्या कर्मचारी व ग्रामस्थांना चकवा दिलेला बिबट्या आता आक्षी- साखर गावात पोहोचला असून शुक्रवारी सकाळच्या शांततेत त्याने अचानक दहशत पसरवली. नागाव परिसरातून पसार झालेल्या बिबट्याने आक्षी साखर गावातील आनंद कामतप्रसाद निषाद (मूळ – चांदा, उत्तर प्रदेश; सध्या – आक्षी, साखर, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड) आणि मुव्वला लोकांथाम (मूळ – जीमंगळवाडी, श्रीकाकुलम, आंध्र प्रदेश; सध्या – आक्षी, साखर, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड) यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही किरकोळ जखमी झाले असून त्यांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
आनंद कामतप्रसाद यांचे उपहारगृह आक्षी साखर येथील जेट्टीजवळ आहे. सकाळी ५ वाजता त्यांनी उपहारगृहात साफसफाई सुरू केली होती. बटाटे साफ करत असताना बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. मुव्वला लोकांथाम त्याच्या दुकानात शिंपी काम करत असताना सकाळी त्यांच्यावर मागून हल्ला झाला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी बिबट्याचे दर्शन जेट्टीजवळ झाले. नागरिकांनी तातडीने वन विभागाला पाचारण केले. मात्र, घटनास्थळी फक्त दोन वन कर्मचारी दाखल झाले, त्यामुळे प्रभावी कारवाई होण्यास विलंब झाला.
त्यानंतर वन विभागाने तातडीने पिंजरे, गस्ती पथके आणि आवश्यक साधनसामग्री आणण्याचे आदेश दिले आहेत. हा बिबट्या सतत ठिकाण बदलत असल्याने त्याला पकडणे आव्हानात्मक ठरत आहे. स्थानिकांना सकाळी लवकर आणि सायंकाळी उशिरा एकटे फिरण्यास टाळण्याचे, तसेच घराबाहेर सावधगिरीने हालचाल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नागाव व आक्षी परिसरातील मानववस्तीच्या जवळ वन्यजीवांचे हालचाली वाढल्यामुळे अशा हल्ल्यांचा धोका कायम राहतो. नागावमधील मागील काही दिवसांपासून हा बिबट्या सक्रिय होता आणि तिथे सहा नागरिकांवर हल्ला करून त्याने त्यांना जखमी केले आहे.
वन विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, बिबट्याला पिंजऱ्यात आणण्यासाठी मोठ्या पथकासह लवकरच शोध मोहीम राबवली जाईल. परिसरात नियमित गस्त ठेवून बिबट्याच्या हालचालींचे निरीक्षण करण्याचे आदेशही दिले आहेत.