मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल; शिवसेना मजबूत करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे
नागपूर : “शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही खरी शिवसेना आहे. त्यामुळे आम्हाला त्यांचे आमदार आमच्याकडे घेऊन काय करायचे आहे? मित्रपक्षाचे आमदार घेऊन आम्ही असे राजकारण करत नाही. उलट, शिवसेना मजबूत झाली पाहिजे यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. भविष्यात शिवसेना, भाजप आणि आमची महायुती आणखी मजबूत होताना दिसेल”, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विरोधकांना दिले.
शिउबाठा गटाच्या काही आमदारांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनात माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे (शिंदे) २२ आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा केला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘उद्या कोणी असाही दावा करू शकते की उबाठाचे २० आमदार भाजपमध्ये येत आहेत. असले दावे करून काही होत नाही. आम्हाला शिवसेनेचे आमदार घेऊन काय करायचे आहे? आम्ही मित्रपक्ष मजबूत करण्यासाठी काम करतो, त्यांना कमकुवत करण्यासाठी नाही.’’
‘वंदे मातरम’ला तोडणे हे काँग्रेसचे पाप
- ‘वंदे मातरम’ला ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त हिवाळी अधिवेशनात सोमवारी या गीताचे गायन करण्यात आले. उबाठा गटाने त्यावरूनही राजकारण केले. त्यावर पलटवार करताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘वंदे मातरमवर कधीच बंदी नव्हती. जो काही अपमान झाला, त्याला काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसनेच प्रस्ताव मंजूर करून वंदे मातरमला तोडले आणि फक्त अर्धेच गीत गायले जाईल असे केले. आज ज्या काँग्रेससोबत ठाकरे गळ्यात गळे घालून फिरतात, त्यांनाच हा प्रश्न विचारायला हवा. भाजपच्या काळात मात्र वंदे मातरमचा नेहमी सन्मान झाला आहे.’’
- वंदे मातरम हे केवळ गीत नाही, तर ते भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा आणि राष्ट्रवादाचा मंत्र आहे. कित्येक क्रांतिकारकांनी फाशी स्वीकारतानाही ‘वंदे मातरम’च्या घोषणा दिल्या. या महामंत्राने सामान्य जनतेला स्वातंत्र्यलढ्याशी जोडले. आज आमच्या विधानसभेतही आम्ही पूर्ण वंदे मातरम गाऊन या गीताला वंदन केले. पुढच्या अधिवेशनात विधानसभेतही यावर चर्चा होईल,’’ असे अध्यक्षांनी जाहीर केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.






