नवी दिल्ली : देशातील एक विमान सेवा कंपनी सध्या आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. गेला आठवडाभरात शेकडो उड्डाणे रद्द झाली असून अनेक फ्लाइटला उशीर झाला. डीजीसीएच्या फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (एफडीटीएल) नियमांच्या कडक अंमलबजावणीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. या परिस्थितीत इंडिगोच्या एका वैमानिकाने नाव न सांगता लिहिलेल्या खुल्या पत्रामुळे वादाला नवे वळण मिळाले आहे. हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून कंपनीच्या अंतर्गत संस्कृतीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
या गुप्त पत्रात वैमानिकाने कंपनीच्या व्यवस्थापनावर तीव्र टीका केली आहे. “इंडिगोची घसरण एका दिवसात झालेली नाही. अनुभवहीन आणि अयोग्य लोकांना उच्च पदांवर नियुक्त केल्यामुळे कंपनीचा पाया ढासळला,” असा गंभीर आरोप पत्रात करण्यात आला आहे. “कर्मचारी आणि वैमानिकांचा थकवा, सुरक्षितता आणि कामाचे तास यांची सातत्याने उपेक्षा करण्यात आली. थकवा किंवा जादा कामाबाबत तक्रार करणाऱ्या वैमानिकांना कार्यालयात बोलावून अपमानित केले जात होते. रात्रीच्या ड्युटी वाढवून कोणतेही अतिरिक्त वेतन दिले जात नव्हते. कर्मचारी आणि वैमानिक दोघांच्याही मनोबलावर याचा मोठा परिणाम झाला.” असे त्यात म्हटले आहे.
कंपनीतील वातावरणाचे वर्णन करताना वैमानिक म्हणतो, “कंपनीत ‘‘बेगर्स हॅव नो चॉइस’अशा नावाने घेतल्या जाणाऱ्या सत्रांमध्ये आम्हाला अपमानित केले जात होते. खुर्च्या आणि पदांना बुद्धी व कौशल्यापेक्षा अधिक महत्त्व दिले जात होते. आजची परिस्थिती त्याच चुकीच्या संस्कृतीचे फलित आहे.” पत्रात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर बोट ठेवण्यात आले आहे. संकटाच्या काळात सीईओ नेदरलँड्समध्ये सुट्टीवर असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच काही जणांवर गैरव्यवस्थापन आणि ‘टॉक्सिक वर्क कल्चर’चा आरोप करण्यात आला आहे.
वैमानिकाची सरकारला मागणी
पत्राच्या शेवटी वैमानिकाने केंद्र सरकारला विमान कर्मचारी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. ग्राउंड स्टाफसाठी किमान वेतन निश्चित करणे, प्रत्येक विमानासाठी किमान मनुष्यबळ अनिवार्य करणे, थकवा नियम (एफडीटीएल) पुन्हा तपासून वैमानिक व कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करणे या प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या आहेत. त्याचे म्हणणे आहे की, वर्षानुवर्षे नफ्याच्या हव्यासामुळे आणि खर्चकपातीमुळे सुरक्षा आणि कामाचे वातावरण दोन्ही ढासळले असून आजची परिस्थिती त्याचेच परिणाम आहेत.






