Wednesday, February 25, 2026

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित पद्धतीने सुरळीत पार पडले तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु, असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर उसळलेल्या भीमसागराला संबोधित करताना त्यांनी हे विधान केले. यावरून देवेंद्र फडणवीस यांना पुढच्या वर्षभरात इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्याचा मानस असल्याचे दिसते.

पुतळा संघर्ष समितीच्या मागणीमुळे नव्या सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नव्याने समन्वय समिती स्थापन केली होती. येत्या पावसाळ्यापर्यंत पुतळ्याचा ढाचा उभारण्याचे नियोजन आहे. यानंतर पुतळ्याच्या उभारणीत अडचणी न उद्भवल्यास पुढच्या महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे लोकार्पण होऊ शकणार आहे, असे स्मारक समितीकडून सांगण्यात आले आहे. सध्या स्मारकाचे ५० % काम झाले असून पुतळ्याची उभारणी हे प्रकल्पातील आव्हान आहे. शंभर फुटाचा पायथा आणि साडे तीनशे फूट उंच पुतळा असे एकंदरीत भव्य स्मारक असणार आहे. या स्मारकातील प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्र, वाचनालय, प्रेक्षागृह, वाहनतळाची ५० टक्के स्ट्रक्चरल कामे झाली आहेत.

पुतळ्याबाबतही पॅनेल कास्टिंगचे काम सध्या पूर्ण झाले आहे. शंभर फूट उंचीच्या स्मारक इमारतीच्या विस्तीर्ण चौथऱ्यावर साडे तीनशे फूट उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कांस्य धातूचे आवरण असलेला पुतळा उभारला जाणार आहे. पुतळ्याच्या पायथ्याचे काम सुरू असून सहा हजार टन पोलाद लागणार आहे. त्यापैकी १४०० टन पोलाद आले असून, ६५० टनांचे फॅब्रिकेशन पूर्ण झाले आहे. कांस्य धातूच्या आवरणाचे कामही सुरु असून पुतळ्याच्या दोन्ही बुटांच्या पॅनेल कास्टिंगचे काम पूर्ण झाले आहे. त्यावरील शिलाई, लेस हुबेहूब दिसत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >