टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९ डिसेंबरला होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या टी-२० सामन्याच्या तिकिटांसाठी चाहत्यांनी बाराबती स्टेडियमबाहेर अक्षरशः जनसागर उसळवला. तिकीट खरेदीसाठी एवढी अभूतपूर्व गर्दी झाली की, परिस्थिती हाताबाहेर गेली. अखेरीस, जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांना नाईलाजाने सौम्य लाठीमार करावा लागला.


ओडिशा क्रिकेट असोसिएशनने गुरुवारी (४ डिसेंबर) तिकीट विक्रीची घोषाणा केली होती. त्यानुसार शुक्रवारी (५ डिसेंबर)पासून सकाळी ९ वाजता तिकीट विक्री सुरू झाली. त्यामुळे उत्सुक हजारो चाहत्यांनी ‘भारतीय संघा’ला पाहण्याच्या ओढीने शुक्रवारी पहाटे ६ वाजण्यापूर्वीच बाराबती स्टेडियमच्या गेटवर गर्दी करण्यास सुरुवात केली. रात्री रांगा लावण्यास अधिकाऱ्यांनी मनाई केली असतानाही, काउंटर उघडण्यापूर्वीच गर्दीने प्रचंड रूप धारण केले होते. सकाळी ९ वाजता तिकीट विक्री सुरू होताच, गर्दीचे व्यवस्थापन करणे अधिकाऱ्यांसाठी एक मोठे आव्हान बनले.


‘एक्स’वर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, परिस्थिती अत्यंत बिघडल्याचे दिसून येते. मैदानाबाहेर जवळजवळ चेंगराचेंगरीसदृश वातावरण निर्माण झाले होते. चाहत्यांची गर्दी अनियंत्रित होताना पाहून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. अखेर, जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना सौम्य लाठीमार करावा लागला. यावरून हे स्पष्ट होते की, या मैदानावर होणाऱ्या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये किती तीव्र उत्साह आहे. बाराबती स्टेडियमवर या वर्षातील हा दुसरा आंतरराष्ट्रीय सामना आहे. यापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने इंग्लंडविरुद्ध येथे एकदिवसीय सामना खेळला होता, ज्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला होता.


दरम्यान, एकीकडे टी-२० सामन्यासाठी इतकी उत्सुकता असताना, भारतीय संघ ६ डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. रांची येथे रोमांचक विजय मिळवल्यानंतर, केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चार गडी राखून दारूण पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे, विशाखापट्टणम येथे विजय मिळवून मालिका आपल्या नावावर करण्यास भारतीय संघाला संघर्ष करावा लागणार आहे. २-० अशा मानहानिकारक फरकाने कसोटी मालिकेत पराभव पत्करल्यानंतर, ही एकदिवसीय मालिका जिंकणे संघासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

Comments
Add Comment

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

IND vs SL Galle Test : भारतापाठोपाठ श्रीलंकाही पहिल्या डावात 'ऑलआऊट', जाणून घ्या गॉल कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे किती धावांची आघाडी ?

गॉल : पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सोनल दिनुषाच्या पहिल्यावहिल्या कसोटी शतकानंतरही भारतीय

Ind vs SL Test Match : श्रीलंकेवर फॉलोऑनची टांगती तलवार : लंकेच्या ४६२ धावांत ५ गडी बाद; टीम इंडियाच्या विजयात पावसाचा अडथळा?

Ind vs SL Test Match : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.

Cristiano Ronaldo : रोनाल्डोच्या निवृत्तीचे संकेत; २०२६-२७ हंगाम ठरू शकतो अखेरचा!

मुंबई : फुटबॉल विश्वातील महान खेळाडूंपैकी एक असलेला क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) लवकरच आपल्या २५ वर्षांच्या

INDvsSL : गॉल कसोटी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; जाणून घ्या भारताने किती केल्या धावा ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यातील

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान