नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत यांच्या दरम्यान जहाज उद्योग, बंदरे, वाहतूक, आरोग्य, संरक्षण आणि आर्थिक क्षेत्रात सहकार्यासाठी महत्त्वाचे करार झाले. राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. यानंतर करारांवर सह्या झाल्या.
रशिया आणि भारत यांच्यात झालेल्या २३ व्या शिखर परिषदेनंतर दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना उर्जा क्षेत्रात, प्रामुख्याने नागरी वापराच्या अणुऊर्जेच्या क्षेत्रात सहकार्यासाठी करार झाल्याची माहिती दोन्ही देशांकडून देण्यात आली. दुर्मिळ खनिजांच्या पुरवठा साखळीचे संरक्षण करणे आणि या खनिजांचा सुयोग्य वापर करण्यासाठी नियोजन करणे याकरिता रशिया आणि भारत एकमेकांच्यात समन्वय राखतील, असेही संयुक्त पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. विनाअडथळा शुद्ध ऊर्जेचा पुरवठा, उच्च दर्जाची औद्योगिक निर्मिती आणि उच्च तंत्रज्ञानशी संबंधित उद्योग या क्षेत्रात दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करणार आहेत. चला तर मग, जाणून घेऊ रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात झालेल्या चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे...
- जहाज बांधणीतील सहकार्यामुळे भारत आत्मनिर्भरतेच्या दिशेने आणखी दमदाल पावलं टाकणार आहे. रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे; असे पंतप्रधान मोदी म्हणाले. जहाज बांधणीत कौशल्याधारित रोजगारांना प्राधान्य असेल, असेही ते म्हणाले.
- रशिया आणि भारत यांनी आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी व्हिजन २०३० दस्तऐवजावर स्वाक्षरी केली. लवकरच दोन्ही देश युरेशियन इकॉनॉमिक युनियनसोबत मुक्त व्यापार करार करणार आहेत.
- मागील आठ दशकांत जगाने अनेक चढ-उतार बघितले. पण भारत-रशिया मैत्री ध्रुव ताऱ्यासारखी स्थिर आणि मार्गदर्शक राहिली आहे. हे नाते परस्पर आदर आणि विश्वासावर बांधलेले आहे. आजच्या चर्चेत हे नाते आणखी मजबूत करणाऱ्या सर्व पैलूंवर चर्चा झाली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
- पुतिन यांचे स्वागत करताना पंतप्रधान म्हणाले की, २३ व्या भारत-रशिया द्विपक्षीय शिखर परिषदेत उपस्थित राहून त्यांना आनंद झाला. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी २५ वर्षांपूर्वी या धोरणात्मक भागीदारीचा पाया रचल्याची आठवण मोदींनी करून दिली.
- पुतिन यांच्या कार्यकाळात रशिया आणि भारत मैत्री संबंध नव्या उंचीवर पोहोचले आहेत. रशिया आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणखी वृद्धिंगत होत आहे; असे मोदी म्हणाले.