राष्ट्रवादीच्या ग्रामीण ताकदीसमोर भाजपचे आव्हान

धनंजय बोडके - उत्तर महाराष्ट्र


नगर परिषदांच्या रणधुमाळीत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळाली. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे सात आमदार असून, भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात ठिकठिकाणी जोरदार लढत झाली. भाजपने भगूर व येवला येथे राष्ट्रवादीसोबत तर मनमाड आणि नांदगावमध्ये शिवसेनेच्या (शिंदे गट) मदतीने युती केली. राष्ट्रवादीचे पाच आमदार असलेल्या सात नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये येवला, भगूर येथे राष्ट्रवादीला शिवसेनेने तर उर्वरित पाच ठिकाणी भाजपने राष्ट्रवादीला थेट आव्हान दिले. यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतही भाजप याच पद्धतीचा प्रयोग करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सुमारे आठ वर्षांनी झालेल्या नगर परिषद निवडणुकीत उमेदवार, समर्थक आणि पक्षांमध्ये उत्तम उत्साह जाणवत होता. नाशिक जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी स्थानिक पातळीवर परस्परविरोधी युती करत निवडणूक रिंगण रंगवले. ग्रामीण भागातील सातही आमदार राष्ट्रवादी (अजित पवार गट)चे असून दिंडोरी, निफाड, कळवण–पेठ, देवळाली, इगतपुरी, येवला आणि सिन्नर या मतदारसंघांचा समावेश होतो. शिवसेना (शिंदे गट)कडे मालेगाव बाह्य आणि नांदगाव, तर भाजपकडे बागलाण व चांदवड मतदारसंघ आहेत.


गेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांकडे काहीसे दुर्लक्ष झाले होते. मात्र त्यानंतर नगर परिषद निवडणुकांमध्ये पक्षाने जोरदार तयारी केली. जास्तीत जास्त नगर परिषदांवर नियंत्रण मिळवण्यासाठी बीजेपीने अनेक स्थानिक प्रभावी नेत्यांना पक्षात दाखल करून घेतले. सिन्नरमध्ये खासदार राजाभाऊ वाजे यांचे चुलते आणि मराठा विद्या प्रसारक संस्थेचे प्रतिनिधी हेमंत वाजे यांना पक्षात घेत नगराध्यक्षपदाचा उमेदवारही केले. यापूर्वीच राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे माजी उमेदवार उदय सांगळे आणि क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनाही भाजपात आणण्यात आले. या तिन्ही नेत्यांसह त्यांच्या शेकडो समर्थकांनी भाजपची वाट धरली.


इगतपुरीत माजी नगराध्यक्ष संजय इंदुरकर यांना बीजेपीत घेऊन आमदार हिरामण खोसकर यांच्याविरोधात मजबूत आव्हान उभे करण्यात आले. पिंपळगाव बसवंत आणि ओझर येथे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्या विरोधातही भाजपने जोरदार आघाडी घेतली. चांदवडमध्ये नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार होते; त्यात भाजप उमेदवार वैभव बागुल आणि राष्ट्रवादीचे सुनील बागुल यांच्यात मुख्य संघर्ष दिसून येत होता.


मनमाडमध्ये आठ उमेदवार असून, राष्ट्रवादीचे रवींद्र घोडेस्वार आणि शिवसेनेचे योगेश पाटील यांच्यात तीव्र चुरस दिसत आहे. नांदगावमध्ये भाजप उमेदवार सागर हिरे आणि राष्ट्रवादीचे राजेश बनकर यांच्यात थेट लढत आहे. येवल्यात राष्ट्रवादीचे राजेंद्र लोणारी आणि शिवसेनेचे रूपेश दराडे आमने-सामने आहेत. भगूरमध्ये शिवसेनेच्या अनिता करंजकर आणि राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे यांच्यात मुकाबला तीव्र आहे.


पिंपळगाव बसवंत येथे तिरंगी लढत असून राष्ट्रवादीचे शरद गायकवाड, भाजपचे डॉ. मनोज बर्डे आणि काँग्रेसचे संतोष गांगुर्डे रिंगणात आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपचे कैलास घुले आणि राष्ट्रवादीचे सुरेश गंगापुत्र यांच्यात मुख्य लढत अपेक्षित आहे. सिन्नरमध्ये पंचरंगी सामना असून भाजपचे हेमंत वाजे, राष्ट्रवादीचे विठ्ठल उगले आणि शिवसेनेचे प्रमोद चोथवे हे प्रमुख दावेदार आहेत. इगतपुरीत शिवसेनेच्या शालिनी खताळे आणि भाजपच्या मधुमालती मेंद्रे समोरासमोर आहेत. सटाण्यात भाजप उमेदवार योगिता मोरे आणि शिवसेनेच्या हर्षदा पाटील यांच्यात मुख्य टक्कर आहे. अनेक ठिकाणी राजकीय पक्षांनी आपल्या सोयीचे राजकारण केले असले तरी अंतिम निर्णय जनता जनार्दनच देणार आहे आणि त्यासाठी २१ डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.


या लढतीकडे राज्याचेच लक्ष

सिन्नरमध्ये मंत्री माणिकराव कोकाटे विरुद्ध खासदार राजाभाऊ वाजे, येवल्यात मंत्री छगन भुजबळ विरुद्ध आमदार किशोर दराडे, तर मनमाड-नांदगावमध्ये मंत्री भुजबळ विरुद्ध आमदार सुहास कांदे अशी अप्रत्यक्ष लढत रंगली आहे. आमदार सरोज अहिरे यांच्या विरोधात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय करंजकर यांच्यात प्रचार काळात तू तू मैं मैं झाले. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवडणूक आखाड्यात जरी नसले तरी त्यांनी शेवटच्या टप्प्यातील प्रचार सभेत ऑनलाईन भावनिक साद घातली. निवडणुकीच्या तोंडावरच ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी आ. किशोर दराडे तर संभाजीराजे पवार यांनी मंत्री भुजबळ यांना साथ दिली. त्यामुळे नाशिकमधील या नगर परिषदांकडे केवळ जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचेही लक्ष लागून राहिले आहे.
Comments
Add Comment

सार्वजनिक ठिकाणी रोमान्स ठरू शकतो कायदेशीर गुन्हा

मीनाक्षी जगदाळे भारतात कारमध्ये, सार्वजनिक ठिकाणी किंवा जवळपास कुठेही पार्किंग करून सेक्स किंवा रोमांस करणे

विमानतळाजवळच्या 'रिअल इस्टेट'चं चांगभलं

प्रा. सुखदेव बखळे नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होऊन दोन महिने झाले. २५ डिसेंबरपासून या विमानतळावरून आकासा आणि

मध्य महाराष्ट्रात नाट्यक्षेत्रात अनास्थेचे प्रयोग

पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. या सांस्कृतिक प्रवाहात नाट्यकलेला विशेष स्थान आहे.

पालिका निवडणुकीत दक्षिण महाराष्ट्रातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीने दक्षिण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आठ-नऊ वर्षांनंतर स्थानिक

कामगार संहितेमुळे आधुनिक आणि दूरदर्शी युगाचा प्रारंभ

वीणू जयचंद (लेखिका EY मध्ये पार्टनर असून आफ्रिका, भारत आणि आग्नेय आशियातील परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट आणि कौशल्य

कोकणात उबाठा हरवलीय!

वार्तापत्र : कोकण पक्षीय राजकारणात निवडणुकीच्या माध्यमातून जनतेसमोर जात विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करत