मानवतावादाचा मुखवटा

कोणताही संघर्ष आतापर्यंत युद्धाने संपलेला नाही आणि कोणताही पेच युद्धाने सुटलेला नाही. तरीही युद्धे सातत्याने घडत असतात आणि त्यात हजारो लोकांचे बळी जातात.अनेक युद्धांत असे दिसले आहे, की फक्त त्यांच्या शस्त्रास्त्र कंपन्यांना युद्धाचा फायदा झाला आहे आणि नागरिकांचे जीव युद्धात गेले आहेत. सध्या ज्वलंत उदाहरण आहे ते रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचे. युक्रेनमध्ये रोज शेकडो निरपराध नागरिक आपले जीव गमावत आहेत आणि कोणत्या तरी देशाच्या युद्धलालसेपायी आणि सीमा बळकावण्याच्या हव्यासापायी लोकांचे जीव घेत आहेत. यात केवळ शस्त्र कंपन्या मात्र मालामाल होत आहेत. युक्रेन आणि गाझा पट्टीतील युद्धे चर्चेचा विषय बनली आहेत आणि त्यात लक्ष वेधून घेतले आहे ते केवळ शस्त्रे बनवणाऱ्या कंपन्यांनी. एका अहवालानुसार, त्यांची कमाई गेल्या वर्षी ५.९ टक्क्यांनी वाढली आहे. त्यातही अमेरिका आणि युरोपातील कंपन्या आघाडीवर आहेत आणि अमेरिकेतील ३० उदा. लॉकहिड, मार्टिन, नॉथ्रॉप ग्रुम्मन आणि जनरल डायनेमिक्स यांसारख्या कंपन्यांना सर्वाधिक लाभ झाला आहे. या कंपन्यांचा एकूण महसूल ३३४ अब्ज डॉलर इतका झाला आहे. अर्थात यात भारतातील तीन कंपन्या समाविष्ट आहेत. सर्वच देश आज मानवतावाद आणि मानवी हक्क याबद्दल बोलतात, पण वैयक्तिक स्तरावर मात्र प्रत्येक राष्ट्र आपल्याकडे जास्तीत जास्त शस्त्र असावीत याच मताची आहेत आणि त्या दृष्टीने त्याचे प्रयत्नही सुरू असतात. अर्थात जागतिक शस्त्रस्पर्धेत आपण मागे पडू अशी भीतीही यामागे असते. त्यामुळे आज भारत अण्वस्त्र संपन्न राष्ट्र आहे, कारण त्याला पाकिस्तानची भीती आहे आणि वेळोवेळी भारताने अण्वस्त्र सज्ज नसल्याचे परिणाम भोगले आहेत. जेव्हा भारत अण्वस्त्र सज्ज नव्हता तेव्हा चिमुकली राष्ट्रेही त्याला डोळे दाखवत होती. आज तशी हिंमत अगदी अमेरिकेकडेही नाही. ती ताकद भारताने प्रयत्नपूर्वक मिळवली आहे. तरीही काही देशांनी स्थापन केलेल्या अण्वस्त्र प्रसारबंदी कराराचा भारत भाग नसला तरीही १९९८ मध्ये पोखरण येथे अणुचाचणी केली आणि त्यानंतर न्यूक्लिअर मोरेटोरियमवर स्वाक्षरी केली. म्हणजे भारत आपल्या अणुबाॅम्बचा वापर आपणहून कुणाविरोधात करणार नाही असा तो करार होता. पण कंपन्यांच्या शस्त्रास्त्र स्पर्धा तीव्र झाल्या आहेत आणि त्यात सर्वच देशांच्या शस्त्र कंपन्या आहेत. रशिया, पश्चिम आशिया येथे सतत युद्धजन्य परिस्थिती असते आणि तेथे शस्त्रांची विक्री वाढली आहे.

ईस्त्रायल आज जगातील सर्वात ताकदवान राष्ट्र आहे आणि ते तर सर्व बाजूंनी शत्रुराष्ट्रानी वेढले आहे. त्यामुळे त्याला काहीही वाटले तरीही शस्त्रसज्ज होण्याची आवश्यकता आहे. हे सारे समजून घेतले तर शस्त्र कंपन्यांच्या मालामाल होण्यामागील अर्थकारण कळू शकते. या शस्त्रास्त्र कंपन्या आणि त्यांच्यातील स्पर्धा यामुळे जागतिक अर्थकारणावर होणारा परिणाम तर दिसतोच आहे. पण तो अपरिहार्यही आहे. कारण आज जगाला केवळ ताकदीची भाषा कळते. भारताकडे जेव्हा सामर्थ्य नव्हते तेव्हा लहान देशही भारताला डोळे दाखवत असत.आज ती हिंमत कुणाकडेही नाही. भारताने ती ताकद कमावली आहे आणि हीच भाषा जगाला कळते. त्यामुळे शस्त्र कंपन्या मालामाल झाल्या तरीही कोणताही देश आज दुसऱ्याच्या हातातील बाहुले नाही हे आजच्या जगाचे वास्तव आहे. जागतिक अर्थशास्त्राचा टीकात्मक पैलू असा आहे, की शस्त्र उत्पादन कितीही नफाखोर असले तरीही त्यात अंति मानवतेचा मुडदा पडतो. विशेषतः जेव्हा युद्धाच्या काळात हे जास्त प्रकर्षाने समोर येते. मानवी आयुष्य जेव्हा हरवते तेव्हा शस्त्र कंपन्या मालामाल होत असतात. त्याला कुणाचाही इलाज नाही. शस्त्र कंपन्यांचे व्यवसाय करण्याचे मॉडेल असे असते, की जितके लष्करी साहित्याचे उत्पादन देशात जास्त होते तितका त्याचा नफा वाढत जातो आणि तितका त्या देशाचा विजय सोपा होतो. भारताने अनेकदा हे अनुभवले आहे. विशेषतः मोदी सरकार आल्यावर भारताने संरक्षण उत्पादनाचे महत्त्व ओळखले आणि प्रत्येक वेळेला पाकिस्तानला पाणी पाजले आहे. मग ते कारगीलचे युद्ध असो, की ऑपरेशन सिंदूर असो. त्यामुळे भारताला कुणी कितीही नावे ठेवली तरीही युद्धाचे महत्त्व पटले आहे आणि त्यात लोकांचे जीव वाचवणे जास्त महत्त्वाचे असते, हेही पटलेले आहे.

युद्धकाळात आणि नंतरही कणव आणि दु:ख करण्याऱ्यांसाठी ढाळलेले अश्रू हे आपल्या दुर्बलतेची जाणीव करून देत असतात हे विसरून प्रत्येक राष्ट्राने प्रत्येक वेळेला वागले पाहिजे. त्यामुळे हे म्हणणे कितीही योग्य असले की लोकांचे जीव जात असले तरीही आपणही इतरांसारखे डोळ्यांवर कातडे ओढून शांत बसले पाहिजे हे चूक आहे. शेवटी आपल्या लोकांचे जीव वाचवणे आणि आपल्याला मुक्त आणि सुखी जीवन जगण्याची हमी असणे हेच आपल्या जीवनाचे उद्दिष्ट असते आणि ते युद्धातील विजयानेच मिळत असते. पण याचा अर्थ ऊठसूठ युद्ध करणे आणि आपल्याहून दुर्बल राष्ट्रांच्या लोकांचा बळी घेणे नव्हे. त्यामुळे युद्धपिपासू वृत्तीपासून आपण दूरच राहिले पाहिजे. पण वेळप्रसंगी आपण संरक्षणासही सिद्ध असले पाहिजे. शस्त्र कंपन्या मालामाल होत असतील तर त्या देशांची चूक आहे. पण रशिया आणि युक्रेन यांसारख्या देशांनी आपली युद्धखोर वृत्ती आवरली पाहिजे. म्हणून तर मोदी यांनी रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धात मध्यस्थी केली होती आणि आज दोन्ही देश मोदींचे म्हणणे मान्य करतात. भारताने तिसऱ्या देशांच्या प्रकरणात काही करू नये हे आपले अलिप्ततावादाचे धोरण झाले. मोदी यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात तोडगा सुचवला होता. अर्थात या युद्धात भारताला काहीही मिळणार नव्हते. पण एक देश दुसऱ्या देशाची सीमा बळकावू पाहतो आहे हे आपण सहन करू शकत नाही हेच मोदी यांनी दाखवून दिले. आज संरक्षण उद्योग हा कोणत्याही देशाचा आणि जागतिक अर्थकारणाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. कंपन्यांनी असा युक्तिवाद केला आहे, की ते देशाच्या सुरक्षेला पाठिंबा देतात. त्यांच्यामुळेच तर कामगार शक्तीला योग्य वेतन आणि काम मिळते. त्यामुळे कंपन्यांच्या युक्तिवादाकडे दुर्लक्ष करता येत नाही. पण हेही विसरून चालणार नाही की या कंपन्यांच्या आर्थिक यशात कित्येक बळी गेलेल्यांचे आत्मे आहेत आणि त्यांचे उद्ध्वस्त जीवन आहे. कॉर्पोरेट कंपन्यांचे यश आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करून गेलेले प्राण यांत विसंवाद आहे. आपल्याला भूमिका घेताना ही बाजूही लक्षात घेतली पाहिजे.
Comments
Add Comment

सभा चालू द्या

पंधरा दिवसांचं कामकाज आखलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस काल तुलनेने शांतपणे व्यतीत झाला.

ऐका निसर्गाच्या हाका

नेमेचि येतो पावसाळा' हे वचन आता इतिहासात राहिले आहे. सध्या पाऊस भारतीय उपखंडात आणि दक्षिण भारतात वाढत चालला आहे

बिघडलेल्या हवेचे वर्तमान

मुंबईची हवा सध्या पूर्ण बिघडली आहे. राजकारणाने नाही; हवेतील धुलीकणांनी. राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या

राष्ट्रीय चेतनेचा उदय

अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज विराजमान झाला तो दिवस मंगळवार २५ नोव्हेंबर २०२५. या भव्य मंदिरावर

भारतीय ‘अ‍ॅशेस’!

‘इंग्लिश क्रिकेटचा मृत्यू झाला!’ क्रीडा पत्रकार रेगिनाल्ड शर्ली ब्रूक्स यांनी ‘द स्पोर्टिंग टाइम्स’

स्मरण २६/ ११ चं

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज बरोबर सतरा वर्षे पूर्ण झाली. कटू आठवणी खरेतर