मुंबई : राज्यातल्या २६४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान झाले. लोकशाहीच्या दृष्टीने एक चांगले सकारात्मक चित्र दिसले. कोणी परदेशातून आले तर कोणी घोड्यावरुन आले पण मतदान करुन गेले. हौशी मतदार आकर्षक वेशात आले आणि मतदानाचा हक्क बजावून गेले. आधी लगीन लोकशाहीचं मग आपलं असं म्हणत काही नवरदेवांनी आणि नवरदेवींनी लग्नाआधी मतदान करुन नव्या आयुष्याची सुरुवात सकारात्मक वातावरणात केली. मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच अशी होती. वेळ संपली असली तरी अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा असल्यामुळे मतदान अद्याप सुरू आहे. नियमानुसार मतदानाची वेळ संपते त्यावेळी रांगेत उभ्या असलेल्या सर्वात शेवटच्या व्यक्तीची नोंद करतात आणि त्या व्यक्तीचे मतदान होईपर्यंत मतदान केंद्रावर प्रक्रिया सुरू असते. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी उत्साहाने मतदान झाले.
मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने आहे हे रविवार २१ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी झाल्यावर समजणार आहे. पण त्याआधी नागरिकांनी उत्साहाने त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. काही ठिकाणी राडे झाले. पण या निवडक घटना वगळल्या तर सर्वत्र मतदारांचा उत्साह दिसला. ज्यांची लग्न होती अशा अनेक नवरदेवांनी आणि नवरदेवींनी लग्नाआधी मतदान करुन नवी सुरुवात केली. या तरुण तरुणींनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन केले. मनमाडमध्ये शिवसेना उमेदवार रोहनने लग्न, मतदान आणि उमेदवार म्हणून निवडणूक नियोजन ही कसरत लिलया केली. नोकरीसाठी अमेरिकेत गेलेल्या अमेय सोमवंशीने बदलापूर नगरपालिकेसाठी मतदानाचा हक्क बजावला. वर्ध्यात अक्षय बहादूरकरने पुलगाव येथे नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान केले. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये नवरदेव घोड्यावर बसून थेट मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आला. तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील बूथवर जाऊन संकेत भोजनेनं मतदान केलं. पंढरपूरमध्ये गब्बरसिंगच्या पोषाखात येऊन दत्तात्रय सूर्यवंशी यांनी मतदानाचा हक्क बजावला.