Monday, December 1, 2025

पाणीपुरी खाल्ली आणि वाचा गेली, महिलेचा जबडा सरकला

पाणीपुरी खाल्ली आणि वाचा गेली, महिलेचा जबडा सरकला

ओरैया : उत्तर प्रदेशमधील औरेया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. पाणीपुरी खाल्ल्यामुळे एका महिलेची वाचा गेली. महिलेचा जबडा पाणीपुरी खात असताना सरकला. आता या महिलेला तोंड बंद करणे आणि बोलणे अशक्य झाले आहे. महिलेला आधी जवळच्या प्राथमिक उपचार केंद्रात नेण्यात आले. तिथल्या डॉक्टरांनी मोठ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. यानंतर महिलेला नातलगांनी मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे.

दिबियापूरच्या गोरी किशनपूर गावात वास्तव्यास असलेल्या ४२ वर्षांच्या इकला देवी कामानिमित्त औरैयाला गेल्या होत्या. कामं आटोपल्यावर त्या एका दुकानात पाणीपुरी खाण्यासाठी गेल्या. तिथे एक पाणीपुरी खाण्यासाठी तोंड उघडले, जे बंद करणे कठीण झाले. जबडा सरकल्यामुळे महिलेला वेदना होऊ लागल्या. वेदना असह्य झाल्यामुळे महिला कळवळू लागली. महिलेच्या नातलगांनी तिला आधी जवळच्या प्राथमिक उपचार केंद्रात नेले. तिथल्या डॉक्टरांनी दिलेला सल्ला ऐकून नातलगांनी महिलेला मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी हलवले. पण अद्याप महिलेचा जबडा जागेवर आलेला नाही. महिलेची अवस्था दयनीय झाली आहे. नातलग चिंतेत आहे.

पाणीपुरी हा चटपटीत पदार्थ अनेकांना आवडतो. कित्येक महिलांसाठी पाणीपुरी म्हणजे जीव की प्राण. पण ही पाणीपुरी खाण्याचे निमित्त व्हावे आणि जबडा सरकावा असा प्रकार महिलेच्या बाबतीत पहिल्यांदाच घडला आहे. या प्रकारामुळे महिला आणि तिचे नातलग धास्तावले आहे. डॉक्टर महिलेचा त्रास कमी व्हावा, तिच्या तब्येतीला आराम पडावा आणि हललेला जबडा जागेवर यावा यासाठी उपचार करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >